देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत: संजय राऊत

| Updated on: Mar 25, 2021 | 11:05 AM

फक्त राज्याचे विरोधी पक्षनेतेच याला विरोध करत आहेत. आधी चौकशी नव्हे तर आधी फाशी द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. फडणवीस यांच्या राजवटीत त्यांनी अशा किती नेत्यांना फाशी दिली, | Sanjay Raut Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत
Follow us on

नवी दिल्ली: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे खूप मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिमा मलीन होईल, नष्ट होईल, असे वर्तन करु नये. राज्यातील सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन ते विरोधी पक्षाचं हसं करत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. (Sanjay Raut take a dig at BJP leader Devendra Fadnavis)

ते गुरुवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली. परमबीर सिंह यांच्या पत्रात संशय घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. इतर कोणी पत्र लिहून दिले आणि परमबीर सिंह यांनी त्यावर फक्त सही केली का, अशी शंका संजय राऊत यांनी बोलून दाखवली.

याप्रकरणात अनिल देशमुख आणि राज्य सरकार पहिल्या दिवसापासून चौकशी करा, असं म्हणत आहे. चौकशीला कोणीही नकार दिलेला नाही. फक्त राज्याचे विरोधी पक्षनेतेच याला विरोध करत आहेत. आधी चौकशी नव्हे तर आधी फाशी द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. फडणवीस यांच्या राजवटीत त्यांनी अशा किती नेत्यांना फाशी दिली, असा रोकडा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच आता याप्रकरणात फार काही घडणार नाही, याचा फार चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले. तसेच याप्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार असल्याने अनिल देशमुख यांना मंत्रिपदावरून पायउतार होण्याची गरज नाही, अशी भूमिकाही संजय राऊत यांनी मांडली.

‘राज्यपालांना गिनीज बुक ऑफमध्ये रेकॉर्ड नोंदवायचाय’

महाविकासआघाडी सरकारने सुचविलेल्या 12 आमदारांबाबत राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यांच्याकडून आम्ही अभ्यास करतोय, असे सांगितले जात आहे. बहुधा ते 12 आमदारांच्या नियुक्तीविषयी पीएचडी करत असावेत. तसेच 12 आमदारांची नावं किती जास्त काळ मांडीखाली दाबून ठेवता येतील, याचा विक्रम राज्यपालांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवायचा असेल, अशी खोचक टिप्पणीही संजय राऊत यांनी केली.

‘यूपीएची पुनर्बांधणी व्हायला पाहिजे, शरद पवारांना प्रमुख करावे’

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) प्रमुखपदी शिवसेनेने शरद पवार यांचे नाव सुचवल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला. यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्याप्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांची म्हणणे आहे.

अशावेळी शरद पवार यांच्याकडे किती खासदार आहेत, हा प्रश्न नाही. मी नेहमीच शरद पवार यांचे समर्थन केले आहे. जे पक्ष यूपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत अशा पक्षांना एकत्र आणून यूपीएची पुनर्बांधणी झाली पाहिजे. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

(Sanjay Raut take a dig at BJP leader Devendra Fadnavis)