मुंबई : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा 37 दिवसांपूर्वी होणं हे सर्वांसाठी सरप्राईजिंग होतं, मात्र काही दिवसातच मुख्यमंत्रीपदावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. काळजावरती दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावं लागलं, या चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर भाजप नेत्यांना स्पष्टीकरणं देत फिरावं लागलं होतं. अशातच आता मंत्रिमंडळ विस्तारावरून (Cabinet Expansion) सरकारला रोज सवाल विचारले जात असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठं विधान केलंय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच मुख्यमंत्री म्हणून जनता पाहत होती, असे मुनगंटीवार म्हणालेत. त्यामुळे भाजपला नाईलाजस्तव शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलंय का? असाही सवाल राजकारणात विचारण्यात येत आहे. तर मुनगंटीवार यांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरेंवरही पुन्हा जोरदार हल्लाबोल चढवलेला आहे.
तर गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींवर विरोधक यावरूनच भाजपवर रोज हल्लाबोल चढवत आहेत. कधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या समोरचा माईक घेतात, तर कधीच चालू पत्रकार परिषदेत चिट्टी येते, यावरून गेल्या काही दिवसात सडकून टीका झालेली आहे. त्यातच आता अलीकडेच मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यातलाही एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये नीती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत उभा राहिलेले दिसत आहेत आणि त्यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता पुन्हा डिवचलं आहे.
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! pic.twitter.com/3xYPid3U3N
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022
जनतेचा विश्वासघात तेव्हाच्या शिवसेना नेत्यांनी केला. तो ईश्वरानं व्याजासकट परत केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यागमुर्ती आहेत. पक्ष हा खाजगी मालमत्ता नाही खाजगी व्यक्तींचा असू शकत नाही. कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष मोठा होतो. बहुमतानं ठरवलं असेल तर त्याचा सन्मान झाला पाहिजे, घराणेशाहीचा पक्ष असू शकत नाही. तुम्ही सांगताय मातोश्रीवर शब्द दिला. मात्र अमित शहा असं काही बोलले नाहीत. विश्वासघात शिवसेनेच्या नेत्यांनी केला, भाजपच्या 105 जागाच येतात हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग हे अशा कथा निर्माण झाल्या, अशी टीका मुनगंटीवार यांनी केलीय.
तसेच 15 ऑगस्टच्या आधी मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. आमच्यासाठी मंत्रीपद महत्वाची नाहीत. आमच्यापेक्षा जास्त काळजी विरोधी पक्षाला आहे. आमच्यातलं कोण मंत्री होणार?. विधानसभेचा अध्यक्ष तर एक वर्ष केला नाही तेव्हा तुम्हाला चिंता नव्हती का ? अशी टीका त्यांनी अजित पवारांवरही केली आहे.