Minister Portfolios : गुवाहाटीत बंड, शिवसेनेला खिंडार, अर्धे खासदारही फोडले, शिंदे गटाच्या पारड्यात काय? खातेवाटपात भाजपाने गुंडाळलं? आता तरी निधी मिळणार का?

| Updated on: Aug 14, 2022 | 7:28 PM

Minister Portfolios : नव्या सरकारमध्ये जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिंदे गट आपल्याकडे अर्थ खातं घेईल असं वाटत होतं. पण ही अपेक्षा फोल ठरली आहे. शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद देऊन त्याबदल्यात उपमुख्यमंत्रीपद, महसूल, अर्थ आणि गृहखातं भाजपने आपल्याकडे ठेवलं.

Minister Portfolios : गुवाहाटीत बंड, शिवसेनेला खिंडार, अर्धे खासदारही फोडले, शिंदे गटाच्या पारड्यात काय? खातेवाटपात भाजपाने गुंडाळलं? आता तरी निधी मिळणार का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं. त्यानंतर या आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेतील खासदारांनीही बंड केलं आणि थेट शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटाचं बळ वाढलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडे (ncp) अर्थ खातं होतं. त्यामुळे निधी वाटपात राष्ट्रवादीकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता. काही आमदारांनी तर निधीच मिळाला नसल्याचा आरोप केला. निधी न मिळाल्यानेच असंतोष होता. त्यामुळेच आम्ही बंड करण्याचा निर्णय घेतल्याचं शिंदे गटाच्या आमदारांनी म्हटलं होतं. मात्र, आता नव्या सरकारमध्येही (Maharashtra Minister Portfolios) अर्थ खातं मित्र पक्षाकडे गेलं आहे. भाजपकडे (bjp) हे खातं गेल्याने आता तरी शिंदे गटातील आमदारांना निधी मिळणार का? असा सवाल केला जात आहे. तसेच अर्थ खातं आपल्याकडे घेऊन भाजपने शिंदे गटाला गुंडाळल्याचीही चर्चा आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली होती. या आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आलं होतं. पण गृहखातं आणि अर्थ खातं राष्ट्रवादीकडे गेलं होतं. महसूल खातं काँग्रेसकडे गेलं होतं. ठाकरे सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं होतं. अजित पवार यांनी या खात्याचा पुरेपूर वापर करत राष्ट्रवादीच्या आमदारांना भरपूर निधी दिला. एवढेच नव्हे तर निवडणुकीत पराभूत झालेल्या आमदारांनाही अजित पवार यांनी निधी दिला. या निधी वाटपात शिवसेनेच्या वाट्याला प्रचंड कमी निधी आला. शिवसेनेच्या काही आमदारांना तर निधीच मिळत नव्हता. या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे वारंवार तक्रारीही केल्या. पण उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी बंड केलं आणि त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. निधी मिळत नसल्यानेच आम्ही हा निर्णय घेतल्याचं या बंडखोर आमदारांचं म्हणणं होतं. निधी मिळत नाही, मग मतदारसंघाचा विकास कसा करायचा? पुढच्यावेळी आम्हाला निवडून यायचं आहे. त्यासाठी निधी हवा, असं या आमदारांचं म्हणणं होतं.

हे सुद्धा वाचा

आता काय?

नव्या सरकारमध्ये जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिंदे गट आपल्याकडे अर्थ खातं घेईल असं वाटत होतं. पण ही अपेक्षा फोल ठरली आहे. शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद देऊन त्याबदल्यात उपमुख्यमंत्रीपद, महसूल, अर्थ आणि गृहखातं भाजपने आपल्याकडे ठेवलं. विशेष म्हणजे अर्थ खातं फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात महत्त्वाची खाते आपल्याकडे घेऊन शिंदे गटाला गुंडाळल्याचं बोललं जात आहे. तसेच आता फडणवीस यांच्याकडे अर्थ खातं असल्याने शिंदे गटाच्या आमदारांना निधी मिळणार का? असा सवाल केला जात आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यातच निधीबाबतची माहिती समोर येईल आणि तेव्हाच खरं चित्रं स्पष्ट होईल, असं सांगितलं जात आहे.

कुणाला कोणतं खातं

राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित: आदिवासी विकास

गिरीष महाजन: ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे: बंदरे व खनिकर्म

संजय राठोड: अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे: कामगार

संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत: उद्योग

प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार: कृषी

दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे: सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा: पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास