ED Raid Shridhar Patankar : मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई! महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

| Updated on: Mar 22, 2022 | 8:11 PM

ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे. ईडीच्या या कारवाईनंतर आता सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.

ED Raid Shridhar Patankar : मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई! महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
श्रीधर पाटणकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केलीय. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तांची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलंय. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे. ईडीच्या या कारवाईनंतर आता सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.

कायवायांमधून सत्य समोर येईल- शेलार

‘चौकशी यंत्रणा आपलं काम करत असतील तर त्यांना आपलं काम करु दिलं पाहिजे. पंतप्रधानांनी ना खाऊंगा ना खाने दुंगा ही भूमिका जनतेसमोर मांडली आहे आणि त्याला जनसमर्थन आहे. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला, आताच्या कारवाया होत असतील तर त्यातून सत्य बाहेर येईल’, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिलीय.

तपास यंत्रणा पुराव्याच्या अधारेत कारवाई करतात- बावनकुळे

कोणत्याही तपास यंत्रणेकडे कुठलेही पुरावे राहत नाहीत तोवर अशा कारवाया होत नाहीत. मला वाटतं त्यांच्याकडे काही पुरावे असतील. कोणतीही मालमत्ता आपण नियमाप्रमाणे खरेदी करतो तर फरक पडण्याचं कारण नाही. पण तिच मालमत्ता आपण नियम डावलून खरेदी केली असेल तर मग फरक पडतो. आता तपासाअंती कळेल की त्यात काय आहे. तपास यंत्रणा कारवाई करतं तेव्हा काही माहिती असते त्या आधारावरच कुणावरही कारवाई होते, असं भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

जिथे जळतं तिथेच धुर निघत असतो- दरेकर

ईडी असेल किंवा अन्य केंद्रीय तपास यंत्रणा किंवा राज्य सरकारच्या यंत्रणा असतील… जिथे जळतं तिथेच धुर निघत असतो. मला वाटतं ही कारवाई यंत्रणेचा भाग आहे. कायद्यासमोर दूजाभाव नसतो, कायदा सर्वांना समान असतो. देवेंद्र फडणवीसांना नोटीस पाठवता, प्रवीण दरेकरांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा होत नसताना कारवाई करता ती काय प्रेम भावना का? असा सवाल करत दरेकर यांनी ही कारवाई सूडबुद्धीने नसल्याचं म्हटलंय. मला वाटतं की असा कुठलाही इशारा देण्यासाठी कारवाई होत नाही. काही तथ्य असेल तरच कारवाई होते. मोठ्या तपास यंत्रणा हाती काही लागल्याशिवाय कारवाई करत नाहीत, असा दावाही दरेकर यांनी केलाय.

कितीही सूडबुद्धीचं राजकारण केलं तरी सरकार मजबूत- मुंडे

ईडी ही पूर्णपणे महाराष्ट्रातील सरकार घालवण्यासाठी प्रयत्न करतेय का? या प्रश्नाचं उत्तर आज मिळालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत आज ईडी पोहोचली त्यातूनच हे स्पष्ट होतं. पण भाजपनं कितीही सूडबुद्धीचं राजकारण केलं तरी हे सरकार मजबूत आहे. तपास यंत्रणांना काय तपासायचं ते त्यांनी तपासावं, असं आव्हान धनंजय मुंडे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिलंय. आजपर्यंत 58 हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या. त्यातील किती निकाली निघाल्या? या सगळ्या गोष्टी जनतेसमोर येणं गरजेचं असल्याचंही मुंडे म्हणाले.

महाविकास आघाडी घाबरणार नाही- पटोले

केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन महाविकास आघाडीला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. याचे परिणाम भाजपला भोगावे लागणार. महाविकास आघाडीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. हे सूडाचं राजकारण सुरु आहे. त्यांचे चेले-चपाटे गावामध्ये फिरतात ते सांगतात की आज याच्यावर उद्या त्याच्यावर कारवाई. पण महाविकास आघाडी घाबरणार नाही, असं प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलंय.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नितेश राणे

थेट मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई झाली आहे. आता मुख्यमंत्री कशासाठी थांबलेत, त्यांनी राजीनामा द्यावा. आतापर्यंत आम्ही सगळीकडे त्यांचं नाव ऐकत होतो. ते आता सिद्ध झालं आहे. तो पैसा काही त्यांच्या घरापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. ते भुयारी गटार थेट मातोश्रीपर्यंत जातं. त्यामुळे आता मातोश्रीने उत्तर द्यायला हवं, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावं. सचिन वाझे आणि हे पैसे कुठे कुठे फिरत आहेत हे आता समोर आलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नैतिक दृष्टीकोनातून राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी आमदार नितेश राणे यांनी केलीय.

इतर बातम्या :

‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर देशासमोरील मोठा प्रश्न’, पाटणकरांवरील कारवाईनंतर शरद पवारांचा घणाघात

ED Raid : ‘उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही’, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया