तीन वर्ष जेलमध्ये गेलो असतो, सोबत बदनामी घेऊन गेलो असतो : एकनाथ खडसे

| Updated on: Oct 21, 2020 | 3:00 PM

विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करुन घेणं चुकीचे आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले (Eknath Khadse on Anjali Damania)

तीन वर्ष जेलमध्ये गेलो असतो, सोबत बदनामी घेऊन गेलो असतो : एकनाथ खडसे
Follow us on

जळगाव : “विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणं ही जीवनातील सर्वात दु:खाची गोष्ट आहे. मी नुकतंच पंधरा दिवसांपूर्वी त्यातून बाहेर निघालो. त्यातून निघालो नसतो तर तीन वर्ष जेलमध्ये गेलो असतो. यासोबत आयुष्यभर केलेल्या मेहनतीनंतरही बदनामी घेऊन गेलो असतो”, असं भाजप नेते एकनाथ खडसे पत्रकार परिषदेत म्हणाले (Eknath Khadse on Anjali Damania).

एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी स्वत: माहिती दिली. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राजीनामा दिला, असं खडसे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याविरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

“माझ्यावर खोटा विनयभंगाचा खटला दाखल करण्यात आला. दमानिया यांनी त्यांचा विनयभंग केल्याचा खोटा खटला दाखल केला. गुन्हा दाखल करण्यास पोलीस त्यावेळी तयार नव्हते. दमानिया यांनी पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर गोंधळ घातला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला सांगितला”, असं खडसे म्हणाले.

“वास्तविक अशा स्वरुपाचे खोटे गुन्हे नोंद करायला सांगणं चुकीचं आहे. या खटल्यातून मी नुकतंच 15 दिवसापूर्वी बाहेर आलो. छळ किती करावा याला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या. तरीही इतके दिवस मी सहन करत आलो”, असं खडसेंनी सांगितलं.

“विनयभंगाच्या गुन्ह्याबाबत मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा दमानिया मॅडम गोंधळ घालत होत्या, असं उत्तर त्यांनी दिलं. मग त्यांच्याविरोधात 353 दाखल केला नाही. पण माझ्याविरोधात 509 दाखल केला”, असं खडसे म्हणाले (Eknath Khadse on Anjali Damania).

“एखाद्या व्यक्तीवर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणं, कोर्टामध्ये खटला चालणं, यापेक्षा मरण चांगलं. यावर फडणवीस यांना प्रश्न विचारला असता संबंधित महिलेने खटला दाखल करण्यासाठी गोंधळ केला म्हणून गुन्हा दाखल केला, असं तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. मी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, ती मुंबईत मी मुक्ताईनगर तेव्हा नाईलाजास्तव गुन्हा दाखल केला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. नियमानुसार, कायद्यानुसार काम करा, असं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना सांगता आलं असतं. मला खूप बदनामी सहन करावी लागली”, अशी खदखद एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.