Sanjay Raut : शिंदेंचा घात भाजपनेच केला, बीजेपीनेच शब्द फिरवल्यामुळेच शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकलं; राऊतांचा दावा

| Updated on: Jun 26, 2022 | 10:59 AM

anjay Raut : शिवसेनेतून आज जे आमदार बाहेर पडले, त्यातले काही आमदार मूळ शिवसेनेचे नाहीत. अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व महाविकास आघाडीमुळे धोक्यात आले? दीपक केसरकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करीत शिवसेनेत आले व मंत्रीही झाले.

Sanjay Raut : शिंदेंचा घात भाजपनेच केला, बीजेपीनेच शब्द फिरवल्यामुळेच शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकलं; राऊतांचा दावा
शिंदेंचा घात भाजपनेच केला, बीजेपीनेच शब्द फिरवल्यामुळेच शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हुकलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री करण्याबाबत एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचा शब्द होता असे सांगितले जाते. त्यातून हे बंड झाले. मुख्यमंत्री पदाबाबत शब्द असू शकतो, पण भारतीय जनता पक्षाबरोबर झालेला ‘अडीच वर्षे’ मुख्यमंत्रीपदाचा करार भाजपने मोडला. हा करार पार पडला असता तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते हे नक्कीच. उद्धव ठाकरे यांनी त्यांचेच नाव पुढे केले असते. शिंदे यांचा घात भाजपने केला. त्याच भाजपबरोबर शिंदे व त्यांच्या बरोबरच्या आमदारांना आता जायचे आहे. हे आश्चर्य आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले ते नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीची गरज म्हणून. स्वतः शरद पवार व सोनिया गांधी यांनी त्यांना आग्रह केला व मुख्यमंत्रीपदी बसवले, पण शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हुकले ते फक्त भाजपने शब्द फिरवल्यामुळेच, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’मधून हा दावा केला आहे.

शिवसेनेतून आज जे आमदार बाहेर पडले, त्यातले काही आमदार मूळ शिवसेनेचे नाहीत. अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व महाविकास आघाडीमुळे धोक्यात आले? दीपक केसरकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करीत शिवसेनेत आले व मंत्रीही झाले. त्यांनी भाजप व हिंदुत्वाच्या गप्पा मारत सुरतमार्गे गुवाहाटी गाठावी हे गमतीचे आहे. तानाजी सावंत, सुहास कांदे हे फिरस्ते आहेत. ‘चाय तिकडला न्याय’ हे त्यांचे धोरण. असे अनेक जण आहेत. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, लता सोनवणे या आमदारांवर ईडी व जात पडताळणीसंदर्भात तलवारी लटकल्या होत्या. गुवाहाटीस जाण्यापूर्वी तूर्तास त्यांना अभय देण्यात आले. आता किरीट सोमय्या काय करणार?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

राऊत यांचे रोखठोक बोल

  1. शिवसेना सोडून छगन भुजबळ व नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. एकनाथ शिंदे तरी होतील काय? शिवसेनेत राहूनच ते मुख्यमंत्री होण्याची खात्री जास्त होती. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्या बरोबर आहे. या आकड्यांत पैशाला चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ‘ईडी’च्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या शिंदे यांना सोडूनही पळ काढतील. बंडखोरीचा इतिहास तेच सांगतो.
  2. या सर्व घडामोडींचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेतील फुटिरांना प्रोत्साहन देऊन फडणवीस सरकार बनवणार असतील तर ते सरकार टिकणार नाही. या सर्व आमदारांची भूक मोठी आहे. त्यांनी आईला सोडले तेथे फडणवीसांना काय साथ देणार? फुटिरांबरोबर सरकार बनवणे म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या ठरतील! महाराष्ट्र हे स्वीकारणार नाही!
  3. विधिमंडळ पक्षात फूट पडली. म्हणून स्वतंत्र गट स्थापन करून राजकारण करता येणार नाही. विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणजे मूळ पक्ष फुटला असे नाही. पक्षात फूट पडणे व विधिमंडळात फूट पडणे या दोन भिन्न बाबी आहेत. शिवसेना हा पक्ष एकसंध आहे हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले.