Maharashtra Politics : महाराष्ट्रात दोन दिवसात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार, सूत्रांची माहिती; अध्यक्ष निवडीनंतर बंडखोर आमदार परतणार?

| Updated on: Jun 26, 2022 | 9:52 PM

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून रखडलेली विधानसा अध्यक्षांची निवड येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Maharashtra Politics : महाराष्ट्रात दोन दिवसात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार, सूत्रांची माहिती; अध्यक्ष निवडीनंतर बंडखोर आमदार परतणार?
विधानसभा अध्यक्ष निवडणूक (फाईल फोटो)
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर मोठी खळबळ माजली आहे. शिंदे यांच्यासोबत 51 आमदार असल्याचा दावा दीपक केसरकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय. तर बंडखोर आमदारांना अद्दल घडवण्याची तयारी शिवसेनेकडून सुरु आहे. शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांचे विधानसभा (Vidhan Sabha) सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आलीय. त्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांकडे पिटिशन दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून रखडलेली विधानसा अध्यक्षांची निवड येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील राजकीय घडामोंडींच्या पार्श्वभूमीवर अजून एक महत्वाची घडामोड येत्या दोन दिवसांत पाहायला मिळत आहे. दोन दिवसांत विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री गिरीश महाजन हे आपली याचिका सर्वोच्च न्यायालयातून मागे घेणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर राज्यपाल विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला परवानगी देतील. तसंच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर शिवसेनेचे गुवाहाटीतील बंडखोर आमदार महाराष्ट्रात परतण्याची शक्यता वर्तवली जातेय.

शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील ज्या 16 आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात उद्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांकडे पिटिशन दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर नरहरी झिरवळ यांनी या आमदारांना दोन दिवसांत उत्तर देण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्तावही फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय. आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, यावरुन राज्यातील पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.

बंडखोर आमदारांवरील कारवाईबाबत पवारांचे सूचक संकेत

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे 16 पिटिशनही दाखल करण्यात आलेत. त्यानंतर झिरवळ यांनी या 16 आमदारांना नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे शिवसेना कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तशी कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे या बंडखोर आमदारांवर कारवाई कधी होणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला. त्यावेळी बंडखोर आमदार, मंत्र्यांवर आज किंवा उद्या कठोर कारवाई होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.