CM Eknath Shinde : संजय राऊतांमुळेच बंडखोरीची वेळ, भरत गोगावलेंचा थेट हल्लाबोल; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबतही नाराजी

उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांना आमच्याशी चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवत आहेत आणि इकडे हे आमची पदं काढत आहेत, संजय राऊत तोंडाला येईल ते बोलत आहेत, म्हणून आमचं एक एक पाऊल पुढे पडत गेलं, अशा शब्दात भरत गोगावले यांनी राऊतांवर हल्ला चढवलाय.

CM Eknath Shinde : संजय राऊतांमुळेच बंडखोरीची वेळ, भरत गोगावलेंचा थेट हल्लाबोल; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबतही नाराजी
भरत गोगावले, आमदार, शिवसेना
Image Credit source: ANI
| Updated on: Jul 06, 2022 | 3:17 PM

मुंबई : राज्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या साथीनं नवं सरकार आलं. यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदारांकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला जातोय. आमदार संजय राठोड, आमदार शंभुराज देसाई यांच्यानंतर आता शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांना आमच्याशी चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवत आहेत आणि इकडे हे आमची पदं काढत आहेत, संजय राऊत (Sanjay Raut) तोंडाला येईल ते बोलत आहेत, म्हणून आमचं एक एक पाऊल पुढे पडत गेलं, अशा शब्दात भरत गोगावले यांनी राऊतांवर हल्ला चढवलाय.

संजय राऊतांनी नेमकी कुणाची सुपारी घेतली होती?

भरत गोगावले म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बराचसा अवधी दिला होता. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही असं ते सांगत होते पण इकडे आमच्या एक एका लोकांची पदं काढली जात होती. या सगळ्या अनुषंगाने आणि संजय राऊतांचं जे वक्तव्य येत होतं हे काळजाला घरं पाडणारं होतं, लोकांना चिड आणणारं होतं. उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांना आमच्याशी चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवत आहेत आणि इकडे हे आमची पदं काढत आहेत, संजय राऊत तोंडाला येईल ते बोलत आहेत, म्हणून आमचं एक एक पाऊल पुढे पडत गेलं. नाहीतर आम्ही त्या स्थितीत होतो. आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि निर्णय घ्यायला लावला. त्यांनीही सांगितलं की तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडा. वरची लोकं आपल्यासोबत यायला तयार आहे. परंतु ते आमचं काहीही ऐकून न घेता फक्त वन मॅन शो संजय राऊत. त्यांना वाटलं मागच्यावेळी ज्या घडामोडी झाल्या तशा यावेळेला होतील. पण तसं नव्हतं. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर पाईक आहोत. मोडेन पण वाकणार नाही म्हणून आम्ही पुढे जात होतो. संजय राऊतांनी नेमकी कुणाची सुपारी घेतली होती ते आम्हाला काही कळलं नाही.

गेले अनेक दिवस तुम्ही पाहताय की संजय राऊत काय बोलत आहेत आणि त्याचे परिणाम काय होत आहेत. तुम्हाला आमच्यापेक्षा जास्ती माहिती आहे. कारण आम्ही गुवाहाटीला होतो. पण संजय राठोड जे म्हणत आहेत ते खरं आहे. आमचे चाळीस जण आणि अपक्ष मिळून 50 हेच सांगत आलेत, असंही गोगावले म्हणाले.

’12 खासदार संपर्कात आहेत की नाही शिंदे साहेबांनाच माहिती’

आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचं ब्रिद वाक्य घेऊन जात आहोत. बाळासाहेब, दिघे साहेबांना दैवत मानत पुढे जात आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही, सोडणार नाही असं स्वत: मुख्यमंत्री सांगत आहेत. यापेक्षा वेगळा दाखला काय हवाय? ग्रामीण भागात किंवा शहरात विभागप्रमुख, जिल्हा प्रमुख असे सगळे आमच्या संपर्कात आहेत. पण 12 खासदार शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत की नाही याची मला काही कल्पना नाही. परंतु शेवाळेसाहेबांनी काल आणि आज जे काही वक्तव्य केलं त्याचा अर्थ काय याची कल्पना त्यांना यायला हवी, असं सूचक वक्तव्यही गोगावलेंनी केलंय.

बाळासाहेबांची आणि उद्धवसाहेबांची ‘मातोश्री’ वेगळी

मातोश्री हे ठिकाण बाळासाहेबांचं आहे. मातोश्री उभी केली बाळासाहेबांनी. उद्धवसाहेबांनी त्यासमोर नवी मातोश्री उभी केलीय. तर बाळासाहेबांची मातोश्रीसाठी संजय राठोडने सांगितलं त्यावर आम्हाला विचार कारावा लागेल, वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल, मगच आम्ही सांगू शकू. बाळासाहेबांची मातोश्री ही तीन माळ्यांची आहे आणि उद्धव साहेबांची मातोश्री 8 माळ्याची आहे. एवढे माळे आम्हाला चढता येणार नाहीत पण तीन माळे चढू शकतो.

आदित्य ठाकरेंना सोडून 14 आमदारांना नोटीस का?

11 तारखेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. बहुमत आमच्याबाजूने आहे. आता वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही केलंय. आम्ही अजूनही काही गोष्टी विसरलो नाही. शिंदे साहेबांनी सांगितलं की आदित्य ठाकरे यांना बाजूला ठेवून आपण 14 जणांना नोटीस बजावावी त्याप्रमाणे आम्ही ती बजावली.