Elections: नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, उमेदवारी अर्जासाठी आज शेवटची तारीख, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

| Updated on: Dec 07, 2021 | 1:45 PM

राज्यातील 32 नगरपंचायतींमध्ये निवडणूका होणार असून स्थानिक पातळीवर यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. 7 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून येत्या 21 डिसेंबर रोजी यासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

Elections: नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, उमेदवारी अर्जासाठी आज शेवटची तारीख, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये भाजपचे शक्तीप्रदर्शन
Follow us on

मुंबईः राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Nagarpanchayat election ) 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची आज म्हणजेच 07 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. राज्यात महाविकास आघाडीअंतर्गत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रस असे तीन पक्ष एकत्र असताना स्थानिक पातळीवर मात्र कुठे युती तर कुठे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पाहुयात कोणत्या जिल्ह्यात काय आहे स्थिती?

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर या दोन नगरपंचायती तसेच पालघर जिल्ह्यातील तलासरी विक्रमगड, मोखाडा आणि रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर आणि पाली नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या सर्व ठिकाणी 24 नोव्हेंबरपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. प्रत्येक नगरपंचायतीत 17 जागा असून या 11 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, भाजप हे पक्ष या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

ठाणे- शहापूरमध्ये शिवसनेला सुरुंग, काँटे की टक्कर

शहापूरमध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणूक जाहीर झाल्यापासून शहापूरमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. भाजपने आतापर्यंत शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडून शेकडो कार्यकर्ते पक्षात घेतले आहेत. शहापूर नगरपंचायत मध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता असतांना, या वेळी मात्र शिवसेना विरोधी भारतीय जनता पार्टी अशी काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे.

सिंधुदुर्गात भाजपला महाविकास आघाडीचे आव्हान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार नगरपंचायतच्या निवडणुका पार पडणार असून या निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. या चार पैकी वैभववाडी व देवगड नगरपंचायत या ठिकाणी आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातील असून आमदार नितेश राणे स्वतः ठाण मांडून आहेत. काल या दोन्ही निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. सध्या या दोन्ही नगरपंचायत भाजपच्याच ताब्यात असून मात्र यावेळी विरोधकांनी महाविकास आघाडी करत भाजप समोर आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे आमदार नितेश राणेना जातीनिशी मैदानात उतरावे लागले आहे.

रत्नागिरीतील दापोलीत आज उमेदवार निश्चिती

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायत निवडणुकीत कालपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. जात पडताळणी प्रमाणप्रत्रासाठी अनेक उमेदवारांची धावपळ सुरु आहे. 7 डिसेंबरचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आता अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल होतील. त्यानंतरच कोणामध्ये विशेष लढत होईल, हे पाहिले जाईल.

नांदेड: नायगावात आजी-माजी आमदारांत लढाई

नांदेड जिल्ह्यातील नायगांव नगरपंचायतीच्या निवडणुकीत आजी माजी आमदारांत वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण आणि भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार या दोघांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केलीय. वसंतराव चव्हाण यांचे मूळ गांव असलेल्या नायगांव नगरपंचायतीत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे, त्यामुळे ही नगरपंचायत आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आमदारांने जय्यत तयारी केलीय. नायगांवचे मतदार कुणाला कौल देतील याची जिल्ह्यातील सर्वानाच उत्सुकता आहे.

गडचिरोलीत 9 तालुक्यात नगरपंचायत निवडणूक

गडचिरोलीत एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा, भामरागड, मुलचेरा या नऊ तालुक्यात नगरपंचायतची निवडणूक 21 डिसेंबरला होणार आहे. याकरिता उमेदवारी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आजची असून नामांकन सादर करण्यासाठी अनेक पक्षांत रस्सीखेच राजकारण सध्या सुरू असल्याचे गडचिरोली जिल्ह्यात चित्र दिसत आहे, आतापर्यंत अनेक नामांकन भरणाऱ्या उमेदवाराकडे एबी फॉर्म सादर झालेला नाही. त्यामुळे उमेदवारांसाठी आजची शेवटची तारीख आहे.

अमहदनगरमधील कर्जत, पारनेरकडे सर्वांचे लक्ष

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून भाजपने मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले. याठिकाणी माजी मंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सध्या कर्जत नगरपंचायतीत भाजपची सत्ता आहे.

पारनेर नगरपंचायतीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. एकूण 17 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर सेनेकडून माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नीसह 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता सेनेने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना हे तीन पक्ष आमने-सामने असतील. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यातच खरी लढत असणार आहेय. औटी यांच्य साठी अस्तिवाची तर लंके यांच्यासाठी प्रतिष्ठेचा लढाई असणार आहे.

धुळ्यात कागदपत्रांची जुळवाजुळव

धुळ्यात वर्षभरापासून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून 21 डिसेंबरला नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे . नगरपंचायतीसाठी दुसऱ्यांदा ही मतदान प्रक्रिया होणार असून यात नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. कागदपत्रांची जुळवाजुळव करणे यासाठी सर्वपक्षीय इच्छुकांमध्ये तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये धावपळ सुरू आहे .

इतर बातम्या-

Worli Gas Cylinder Blast : उत्तर प्रदेशातील घटनेवेळी कुठे गेली होती संवेदना? पेडणेकरांचा शेलारांना टोला

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : प्रतिक्षा संपली यादीत नाव तपासा अन् खात्री करुन घ्या, सन्मान निधी योजनेतील 10 हप्त्याची