हिंदुस्थानचा राष्ट्र ध्वज भगवाच हवा, भिडे गुरुजी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने 15 ऑगस्ट निमित्ताने हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली आहे. मात्र आता ही पदयात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत.

सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने 15 ऑगस्ट निमित्ताने हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातून धारकऱ्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन ही रॅली काढली. अखंड भारत व्हावा, या उद्देशाने ही पदयात्रा काढाण्यात आल्याची माहिती यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान या पदयात्रेमध्ये संभाजी भिडे यांच्यासह शेकडो धारकरी सहभागी झाले होते. धारकऱ्यांच्या हातात यावेळी भगवे ध्वज, भारत मातेचा फोटो, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे फोटो, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून आला, सांगली शहराच्या मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली.
दरम्यान याच कार्यक्रमाचं एक पोस्टर देखील व्हायरल होत असून, या पोस्टरवर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अखंड हिन्दुस्थानचे स्वप्न उराशी बाळगून ‘अखंड हिन्दुस्थानचा राष्ट्रध्वज म्हणून परम पवित्र भगवाच असला पाहिजे’ हे जगाला ठणकावून सांगण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे हिंदवी स्वराज्य स्वत्यंत्रदिन पदयात्रा असा मजकूर आहे. यावरून आता पुन्हा एकदा संभाजी भिड हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. ही हिंदवी स्वराज्य स्वत्यंत्रदिन पदयात्रा संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली होती, या रॅलीमध्ये शेकडो धारकरी सहभागी झाले हेते.
यावरून आता काँग्रेसने भिडे गुरुजींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मनोहर भिडे यांच्याकडून स्वातंत्र्य दिनी हिंदवी स्वराज्य स्वत्यंत्रदिन पदयात्रा काढण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच संभाजी भिडे हे राष्ट्रध्वजाचा अपमान करत आहेत. अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच वंदे मात्रमचा अपमान झाल्यास शिक्षा मग राष्ट्रध्वजाचा अपमान झाला तर तो कसा काय खपवून घेतला जातो, असा सवालही यावेळी सावंत यांनी उपस्थित केला आहे.
तर दुसरीकडे यावर भाजपकडून देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. कोण काय म्हणत याला महत्त्व नाही. तिरंगा हाच देशाचा ध्वज आहे, भगवा हा आमचा स्वाभिमान आहे. मात्र देशाचा राष्ट्रध्वज हा तिरंगाच अशी प्रतिक्रिया या पदयात्रेवर मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
