युती न झाल्यास उलट आमची एक जागा जास्तच येईल : रावसाहेब दानवे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

जालना : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 48 जागांची तयारी करण्यात येत आहे. खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनीच याबाबत माहिती दिली. जालन्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील 48 पैकी 46 लोकसभा मतदारसंघांचा दौरा करून आढावा घेतला आहे. सध्या भाजपकडून 48 लोकसभेच्या जागा लढविण्याची तयारी केली आहे. युती झाल्यास आम्ही कामं […]

युती न झाल्यास उलट आमची एक जागा जास्तच येईल : रावसाहेब दानवे
Follow us on

जालना : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 48 जागांची तयारी करण्यात येत आहे. खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनीच याबाबत माहिती दिली. जालन्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील 48 पैकी 46 लोकसभा मतदारसंघांचा दौरा करून आढावा घेतला आहे. सध्या भाजपकडून 48 लोकसभेच्या जागा लढविण्याची तयारी केली आहे. युती झाल्यास आम्ही कामं केलेल्या लोकसभा मतदारसंघात मित्रपक्षाला फायदा होईल, असा दावाही यावेळी दानवे यांनी केला. 28 जानेवारी रोजी जालन्यात कलशसीड्स येथील मैदानात भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

विधानसभा आणि लोकसभेचं जागावाटप सोबतच व्हावं, यावर युतीचं घोडं अडलं असल्याचं बोललं जातंय. विधानसभेच्या जागावाटपासाठीही शिवसेना आग्रही असल्याचं बोललं जातंय. पण असं कोणतंही गणित नसल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. युती झाली नाही तरीही भाजप-शिवसेनेने 2014 ला जिंकलेल्या जागांपेक्षा आमची एक जागा जास्तच येईल, असा विश्वासही दानवेंनी बोलून दाखवला.

दरम्यान, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आवर्जून पाहणार असल्याचं दानवेंनी म्हटलंय. बाळासाहेंबांवरील सिनेमा पाहायला कुणाला आवडणार नाही, आम्हीही पाहणार, असं उत्तर दानवेंनी दिलं.

प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील एंट्रीवरही दानवेंनी भाष्य केलं. प्रियांका गांधींचा भाजपवर काहीही परिणाम होणार नसल्याचं ते म्हणाले. शिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी फेल ठरल्यामुळेच प्रियांका गांधींना आणावं लागलं, असं म्हणत त्यांनी काँग्रेस नेतृत्त्वावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं.

युतीवर अमित शाह काय म्हणाले?

मित्रपक्ष सोबत न आल्यास ‘पटक देंगे’ म्हणणाऱ्या भाजपाध्यक्ष अमित शाहांनी एक पाऊल मागे घेतलंय. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांची युती होईल आणि विधानसभा-लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रच लढू, असा दावा अमित शाह यांनी केलाय. ‘मित्रपक्ष सोबत आला तर ठिक, नाही तो पटक देंगे’, असं अमित शाह लातूरमधील कार्यक्रमात म्हणाले होते.

विशेष म्हणजे देशात जे महागठबंधन होतंय, त्याचा फायदा भाजपलाच होईल, असा दावाही अमित शाहांनी केलाय. 2014 पेक्षाही जास्त जागा घेऊन एनडीए सत्तेत येईल, असं ते म्हणालेत. 2014 च्या निवडणुकीत एकट्या भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएतील मित्रपक्षांसह हा आकडा साडे तीनशेच्या आसपास होता.