Bhagat Singh Koshyari : राज्यपालांना डिस्चार्ज, सक्रिय होणार, कोणते निर्णय घेणार?; वाचा 5 शक्यता

| Updated on: Jun 26, 2022 | 11:33 AM

Bhagat Singh Koshyari : एकाही आमदाराने आम्ही पाठिंबा काढल्याचं म्हटलं नाहीये. एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नाही. तसेच शिंदे गटाकडून सरकारचा पाठिंबा काढत असल्याचं पत्रंही दिलं नाही. शिवाय आमचा वेगळा गट विधानसभेत बसेल असंही शिंदे गटाकडून सांगण्यात आलेलं नाही.

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांना डिस्चार्ज, सक्रिय होणार, कोणते निर्णय घेणार?; वाचा 5 शक्यता
राज्यपालांना डिस्चार्ज, सक्रिय होणार, कोणते निर्णय घेणार?; वाचा 5 शक्यता
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यात गेल्या सहा दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह 50 आमदारांनी बंड केल्याने राज्यात राजकीय अस्थिरतेचे ढग जमा झाले आहेत. या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. चार दिवसानंतर त्यांनाही डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यपाल आता सक्रिय होणार आहेत. राज्याची राजकीय परिस्थितीचा राज्यपाल आढावा घेतील. त्यानंतर ते काही निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी त्यांना एक पत्रं लिहिलं आहे. त्या पत्रावरही राज्यपाल काही निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमके कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. संध्याकाळपर्यंत राजभवनातून काही तरी निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज उद्या कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची शक्यता आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय निर्णय घेता येईल, यावर चर्चा करूनच राज्यपाल कोश्यारी पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

ना राजीनामा, ना वेगळा गट, पुढे काय?

एकाही आमदाराने आम्ही पाठिंबा काढल्याचं म्हटलं नाहीये. एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नाही. तसेच शिंदे गटाकडून सरकारचा पाठिंबा काढत असल्याचं पत्रंही दिलं नाही. शिवाय आमचा वेगळा गट विधानसभेत बसेल असंही शिंदे गटाकडून सांगण्यात आलेलं नाही. तसं पत्रं राज्यपाल किंवा विधानसभेच्या उपसभापतींकडे दिलेलं नाही. त्यामुळे सरकार अल्पमतात आलंय किंवा सरकार कोसळलंय असंही म्हणता येत नाही. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा यावरही राज्यपाल कायदेतज्ज्ञांचं मत घेऊनच पुढील पावलं टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वेट अँड वॉच

राज्यपाल सध्याच्या परिस्थितीवर वेट अँड वॉचची भूमिका घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून जोपर्यंत वेगळा गट स्थापन केल्याचं पत्रं किंवा भाजपमध्ये किंवा इतर पक्षात विलीनिकरण झाल्याच्या निर्णयाचं पत्रं किंवा भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देत असल्याचं पत्रं दिलं जात नाही. तोपर्यंत राज्यपाल कोणतीही भूमिका घेणार नसल्याचं बोललं जात आहे. जोपर्यंत शिंदे यांच्याकडून पत्रं येत नाही, तोपर्यंत ठाकरे सरकार अल्पमतात आलंय असं म्हणता येणार नाही. त्यामुळेच राज्यपाल सबुरीचा मार्ग अवलंबणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरेकरांच्या पत्रावर निर्णय

राज्यात अस्थिरता निर्माण झाल्यानंतर आघाडी सरकारने अवघ्या दोन दिवसात भरमसाठ जीआर काढून निधीचं वितरण केलं. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्रं लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. त्यावरही राज्यपाल काही निर्णय घेतील असं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष फोनवरून चर्चा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आणखी एक पर्याय म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणे. राज्यपाल ठाकरेंना फोन करून त्यांच्याशी चर्चा करू शकतात. राजकीय परिस्थितीवर त्यांची भूमिका जाणून घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यपाल आगामी काळात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.