शिवसेनेचं राज्यपालांना, राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र, रिक्त जागांच्या निवडणुकीची मागणी

| Updated on: Apr 30, 2020 | 8:49 PM

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी (Maharashtra Governor letter to Election Commission) लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे.

शिवसेनेचं राज्यपालांना, राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र, रिक्त जागांच्या निवडणुकीची मागणी
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी (Maharashtra Governor letter to Election Commission) लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे. राज्यापालांनी पत्रामार्फत ही विनंती केली आहे. विधानपरिषदेच्या 9 जागा 24 एप्रिलपासून रिक्त झाल्या आहेत. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे (Maharashtra Governor letter to Election Commission) .

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्याअगोदर शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीचं पत्र दिलं. शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी निवडणूक घेण्याचे पत्र दिले. राजभवनावर येऊन शिवसेना नेत्यांनी हे पत्र राज्यपालांना दिले. असेच पत्र केंद्रीय निवडणूक आयोगालाही देण्यात आले असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कालावधी 24 एप्रिल रोजी संपला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच या रिक्त झालेल्या 9 सदस्यांच्या जागी नवीन सदस्य निवडून आणण्यासाठी निवडणुका होणार होत्या. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु असल्यामुळे ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. आता राज्य सरकारकडून ही निवडणूक पुन्हा घ्यावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यपाल यांना पत्र शिवसेनेकडून देण्यात आलं आहे.

दरम्यान, “केंद्र सरकारने देशात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक शिथिल उपायांची घोषणा केली आहे. काही विशिष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका घेता येऊ शकतात”, असं राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी परिषदेवर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांच्या निर्णयाचं स्वागत

दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. “कोरोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारीजी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.