मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 26 तारखेला मुंबईत संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 26 तारखेला मुंबईत संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी राज ठाकरेंची उद्या सकाळी पत्रकार परिषद होणार आहे. यात या संयुक्त मोर्चाबाबत माहिती दिली जाणार आहे. या आधी मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते, आता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे दोघे एकत्र येणार आहेत. त्यामुळे या संयुक्त मोर्चाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार
दिल्लीतील जंतर मंतरवर अभिजीत दिपके आंदोलन करत आहेत. या आंदोलना ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिलेला आहे. आता या दोन्ही नेत्यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे यावर काही बोलत नाहीत, आंदोलकांवर लाठीचार्ज केला जातो, या सर्व घडामोडीं विरोधात आता ठाकरे बंधुंनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदित्य आणि अमित ठाकरे आंदोलकांच्या भेटीला
त्याआधी आज मनसे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील शिवतीर्थावरील विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, ‘सर्वप्रथम तुम्ही इथे आलात, ही ताकद आहे युवकांची. खुप महत्त्वाचं आहे की आपण सगळे असं एकत्र येतो. इथे राजकीय पक्षाचं कोणी आहे का? कोणी अर्बन नक्षलवादी आहेत का? दहशतवादी आहेत का? इथे जे जे हिंदुस्थानी नागरिक असतील त्यांनी वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा द्या. हीच आपली ताकद आहे. आज मी आणि अमित वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो, तिथेही असेच तरूण-तरूणी जमले होते. एक गोष्ट आपल्या सर्वांना मानायला लागेल की, दिल्लीमध्ये झालं ते मुंबई पोलिसांनी केलेलं नाही. त्यांनी कुणालाही हात लावलेला नाही, त्यामुळे आपण त्यांचे आभार मानू.’
