मनगटात दम आहे तोच इंदापूरला पाणी देऊ शकतो, हर्षवर्धन पाटलांचा निशाणा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

बारामती : विधानसभा निवडणुकीपूर्वीच इंदापूरच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. अजित पवारांनी इंदापूरच्या जागेवरुन काल ठणकावल्यानंतर आता पुन्हा हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया आली आहे. इंदापूर तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीवरुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर निशाणा साधलाय. इंदापूर तालुका पाण्यासाठी होरपळतोय. […]

मनगटात दम आहे तोच इंदापूरला पाणी देऊ शकतो, हर्षवर्धन पाटलांचा निशाणा
Follow us on

बारामती : विधानसभा निवडणुकीपूर्वीच इंदापूरच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. अजित पवारांनी इंदापूरच्या जागेवरुन काल ठणकावल्यानंतर आता पुन्हा हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया आली आहे. इंदापूर तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीवरुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर निशाणा साधलाय.

इंदापूर तालुका पाण्यासाठी होरपळतोय. शेतातली पिकं पाण्याअभावी जळून जातायत. मात्र काहींचे 400-400 एकर ऊस अशा दुष्काळातही भिजतात.. जनतेला पाणी देणं हे सायपण देण्याइतकं सोपं नाही. ज्यांच्या मनगटात पाणी आहे, तोच इंदापूरच्या जनतेला पाणी देऊ शकतो, अशा शब्दात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला.

इंदापूर तालुक्यातील अनेक कामांची दोनदोनदा उद्घाटने करण्याचा प्रघात सुरु झालाय. त्यावरून कोणाला नारळ फोडायची हौस आहे हे स्पष्ट झाल्याचा टोलाही त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान, संघर्ष कसा करायचा हे हर्षवर्धन पाटील यांना माहिती असल्याने आतापासूनच विधानसभेच्या तयारी लागावं, असं सांगत आमदार जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांना अपक्ष लढण्याच्या तयारीला लागण्याचा संदेश दिलाय.

इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकी इथल्या विविध विकासकामांचं भूमीपूजन हर्षवर्धन पाटील आणि जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला. अलीकडील काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नवीनच पद्धत सुरु झालीय. एकाच कामाची दोनदा उद्घाटने आणि भूमीपूजन केलं जातंय.. त्यावरून नारळ फोडण्याची हौस कोणाला आहे हे आता स्पष्ट झाल्याचं सांगत त्यांनी आम्ही कधीच प्रसिद्धीसाठी राजकारण समाजकारण केलं नसल्याचा टोला लगावला.

मित्र बदलतो, शत्रूही बदलतो.. मात्र शेजारी काही बदलत नाही.. असं असलं तरी संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पुजलाय.. मात्र ज्याचं दामन साफ आहे त्याने त्रासाची काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगत हर्षवर्धन पाटलांनी अजित पवार यांच्या राजकारणावर घणाघात केला. दुसरीकडे इंदापूर तालुका पाण्यासाठी होरपळत असताना काहींचे 400 एकर ऊस भिजतात. इंदापूरकरांना पाणी देणं हे सायपण पाण्याइतकं सोपं नाही. ज्यांच्या मनगटात दम आहे तोच इथल्या जनतेला पाणी देऊ शकतो, अशा शब्दात त्यांनी आमदार भरणेंवर टीका केली.

संघर्ष कसा करायचा हे हर्षवर्धन पाटील यांनी पूर्वीपासूनच पाहिलंय. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी पक्षाचा काय निर्णय होणार हे न पाहता आतापासूनच विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागावं, असं सांगत अपक्ष लढण्याची तयारी करण्याचा संदेश आमदार जयकुमार गोरे यांनी दिलाय. त्याचवेळी बारामतीशी संघर्ष करण्याची कोणाचीही ताकद नाही. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्यात ही ताकद असल्याने आता स्वाभिमानासोबत राहायचं की बारामतीची गुलामगिरी करायची हे आता जनतेने ठरवावं असंही जयकुमार गोरे यांनी म्हटलंय.

राज्यात आणि देशात काँग्रेस राष्ट्रवादीने गळ्यात गळे घातले असले तरी इंदापूरमध्ये या दोन्ही पक्षात संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातूनच काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादीवर शरसंधान साधलं जातंय. त्यामुळे आता हा संघर्ष किती काळ चालणार हेच पाहणं औत्सुक्याचं ठरेल.