MVA : एकनाथ शिंदेंचे आरोप बिनबुडाचे, कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही, गृहमंत्री वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

| Updated on: Jun 25, 2022 | 12:37 PM

एकनाथ शिंदे यांनी आज आपली आणि आपल्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा आरोप ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

MVA : एकनाथ शिंदेंचे आरोप बिनबुडाचे, कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही, गृहमंत्री वळसे पाटलांचं स्पष्टीकरण
Follow us on

मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांचं संरक्षण महाविकास आघाडी सरकारने काढल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. या आमदारांची कोणत्याही प्रकारची सुरक्षा काढलेली नाही, असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिलं आहे. आज सकाळीच बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 37 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सादर केलं. यात महाविकास आघाडी सरकारने आमची आणि आमच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतली आहे. केवळ राजकीय आकसापोटी असं राजकारण केलं जात असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय. ट्विटरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. मात्र एकनाथ शिंदेंचे आरोप खोटे असल्याचा दावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलाय.

एकनाथ शिंदेंचा आरोप काय?

राजकीय आकसापोटी आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय. तर मागील अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून आमचं याच पद्धतीनं खच्चीकरण सुरु असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं.

गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले

एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांचं संरक्षण सरकारतर्फे काढून घेण्यात आलेलं नाही, असं स्पष्टीकरण महाराष्ट्राचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.

संजय राऊत म्हणतात… कुटुंबाला सुरक्षा नसतेच!

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील एकनाथ शिंदेंच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या आमदारांना सुरक्षा असते, मात्र ती फक्त राज्यात असते. ते इतर राज्यात गेल्यावर संरक्षण देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची नाही. तसंच आमदारांच्या कुटुंबियांनाही संरक्षण नसतं, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बंडखोर आमदारांवर पुढे काय कारवाई होणार, यावर निर्णय घेतला जाईल.