Rajya Sabha Election Results 2022: तो फडणवीसांचा कोणता ‘चमत्कार’ आहे जो पवारांना करता आला ना उद्धव ठाकरेंना ? फडणवीसांचे 5 निर्णय बघा

| Updated on: Jun 11, 2022 | 12:51 PM

Rajya Sabha Election Results 2022: राज्यसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर फडणवीसांनी आधी संभाजी छत्रपती यांना मैदानात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पडद्यामागून त्यांनी हालचाली सुरू केल्या.

Rajya Sabha Election Results 2022: तो फडणवीसांचा कोणता चमत्कार आहे जो पवारांना करता आला ना उद्धव ठाकरेंना ? फडणवीसांचे 5 निर्णय बघा
फडणवीसांनी वेगवेगळ्या मार्गांनी माणसं आपलीशी केली, शरद पवारांना फडणवीसांचा 'चमत्कार' मान्य
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यातील राज्यसभा निवडणुकीचा (Rajya Sabha Election) अखेर मध्यरात्री 3 वाजता निकाल लागला. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तर संख्याबळ असूनही शिवसेनेच्या संजय पवारांना घरी बसावं लागलं आहे. विशेष म्हणजे मतदानाच्या चार दिवस आधी आघाडीने आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलात ठेवले. अपक्षांची मनधरणी करत त्यांच्या मागण्याही मान्य केल्या. तसेच आम्ही सर्व एकत्र आहोत, असं दाखवण्याची एकही संधी आघाडीने सोडली नाही. ट्रायडंटमध्ये आघाडीच्या नेत्यांनी शक्तीप्रदर्शनही केलं. शरद पवार (sharad pawar) आणि मल्लिकार्जुन खरगेंसारखे देशातील दिग्गज नेते सोबतीला असताना आणि मुख्यमंत्रीपद स्वत:कडे असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सीट राखता आली नाही. उलट सत्तेत नसतानाही आणि कोरोनामुळे काही दिवस घरात बसावे लागलेले असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (devendra fadnavis) चमत्कार घडवत आपला उमेदवार विजयी केला. फडणवीस यांनी राज्यसभेत जो चमत्कार केला, त्याला पाच कारणं आहेत. या पाच कारणांवर टाकलेला हा प्रकाश.

संभाजी छत्रपतींचं कार्ड

राज्यसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर फडणवीसांनी आधी संभाजी छत्रपती यांना मैदानात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पडद्यामागून त्यांनी हालचाली सुरू केल्या. संभाजी छत्रपतींना अपक्ष म्हणून मैदानात उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. स्वत: संभाजी छत्रपती यांचे वडील श्रीमतं शाहू छत्रपतींनी यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही खेळी यशस्वी होऊ दिली नाही. पण मराठा समाजात शिवसेना विरोध पेरण्यात फडणवीस तोपर्यंत यशस्वी झाले होते.

हे सुद्धा वाचा

तिसरा उमेदवार उभा करण्याची खेळी

संभाजी छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर फडणवीसांनी तिसरा उमेदवार दिला. विशेष म्हणजे तोही कोल्हापुरातीलच उमेदवार दिला. उमेदवार देताना तो गब्बर आहे की नाही याकडेही पाहिलं. धनजंय महाडिक हे साखर सम्राट आहेत. कारखानदार आहेत. त्यांना फडणवीसांनी मैदानात उतरवलं. भाजपने मातब्बर उमेदवार उतरवल्यामुळे ही निवडणूक शिवसेनेला सोपी नसल्याचं तिथेच अधोरेखित झालं.

अपक्षांना सोबत ठेवण्यात यश

भाजपकडे स्वत:चे म्हणून सहा अपक्ष होते. मात्र, आघाडीकडे 17 अपक्ष होते. भाजपने आपल्याकडी अपक्षांना विश्वासात घेतले आणि सोबत ठेवले. पण आपले अपक्ष सोबत ठेवतानाच आघाडीच्या संख्याबळाला सुरुंग लावण्याचाही प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आलं. अपक्षांना विश्वास दिल्याने आघाडीचे सहा अपक्ष फोडण्यात त्यांना यश आलं.

एक एका मतासाठी प्रयत्न

फडणवीस यांनी राज्यसभेची परफेक्ट गणितं मांडली होती. एका एका मतासाठी त्यांनी जबरदस्त फिल्डिंग लावली. त्यांनी सहा अपक्ष गळाला लावलेच, शिवाय बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनाही आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं. विशेष म्हणजे फडणवीस बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांना भेटले नाहीत. केवळ एका फोनवर त्यांनी ठाकूरांचं मन वळवलं. याशिवाय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार गंभीर आजारी आहेत. त्यांनाही सुरक्षितपणे आणि डॉक्टरांच्या सल्लानुसार मुंबईत आणले आणि त्यांचेही मतदान करून घेतले. त्यामुळे ही दोन मतेही भाजपच्या पारड्यात पडली. या शिवाय मतं बाद होणार नाहीत, याची काळजी घेतली.

कोरोनातून बाहेर पडले आणि चक्र फिरले

राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. त्यामुळे भाजप उमेदवाराच्या काळजात धस्स झालं. पण आजारी असतानाही फडणवीस यांनी वेळ वाया जाऊ दिला नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते सतत पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात होते. पक्षाच्या प्रत्येक बैठकीला ऑनलाईन हजेरी लावत होते. शिवाय फोनाफोनी करून आकड्यांची जुळवा जुळव करत होते. नंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर फडणवीस पुन्हा सक्रिय झाले. प्रत्येक बैठकीला उपस्थित राहू लागेल आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संवाद साधून आकड्यांची जुळवाजुळव करत होते.

मतदानावेळेसची स्ट्रॅटेजी

भाजपने अत्यंत कुशलपणे स्ट्रॅटेजी केली होती. त्यात पहिल्या पसंतीची मते कुणाला द्यायची आणि दुसऱ्या पसंतीची मते कुणाला द्यायची हे ठरलं होतं. तशा सूचना सर्व आमदारांना दिल्या होत्या. त्यानंतर मतदान सकाळीच करायचं हेही ठरलं. कोणताही दगाफटका नको म्हणून आधीच मतदान उरकून घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी आमदारांचे गट तयार करण्यात आले. त्यामुळे काल भाजपचे आमदार गटागटाने मतदान करताना दिसत होते. आजारी आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना मुंबईत आणण्यापासून ते त्यांना मतदानासाठी विधानभवनात आणण्यापर्यंतची जबाबदारी नेत्यांवर दिली. याशिवाय पोलिंग एजंट म्हणून आशिष शेलार, पराग अळवणी आणि अतुल सावे या जबाबदार नेत्यांना बसवण्यात आलं.