मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलल्यास युती शक्य, राज यांच्या भेटीनंतर फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य

| Updated on: Jan 09, 2020 | 2:20 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलल्यास युती शक्य, राज यांच्या भेटीनंतर फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. “मनसे आणि भाजपच्या विचारात अंतर आहे. जर मनसेने  विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात मनसेसोबतच्या युतीबाबत  विचार करु”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Raj Thackeray) यांनी दैनिक लोकमतच्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंबाबतच्या भेटीवर भाष्य केलं.

मनसे आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, त्याबाबत फडणवीस म्हणाले, “मनसे आणि भाजप एकत्र येण्याची आज तरी कोणतीही चिन्हं नाहीत. मनसे आणि भाजपच्या विचारात अंतर आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने व्यापक विचार करतो. पण मनसेचे विचार वेगळे आहेत. मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात  विचार करु, पण सध्यातरी ही शक्यता वाटत नाही.”

फडणवीस-राज ठाकरे भेट

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंगळवारी 7 जानेवारीला गुप्त भेट झाली होती. प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली होती. महत्त्वाचं म्हणजे या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे पुढील दाराने, तर राज ठाकरे मागील दाराने बाहेर पडले. ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात ही दृश्यं कैद झाली होती.

या बैठकीसाठी अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे या बैठकीला उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे या बैठकीसाठी कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय आले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीबाबत मोठी गोपनीयता बाळगली होती. या भेटीनंतर गुरुप्रसाद रेगे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले होते.

मनसेचे महाअधिवेशन

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने, मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या काही दिवसापासून तशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. मनसेचं येत्या 23 जानेवारीला महाअधिवेशन होणार आहे. मनसेच्या कारकिर्दीतील हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनात राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ खडसे काय म्हणाले होते?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यात काय चर्चा झाली याविषयी मला माहिती नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेपासून दूर गेला आहे. जर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सकारात्मक काही चर्चा झाली असेल, तर या मतांचं धृवीकरण होऊ शकतं, असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं होतं.

गिरीश महाजन काय म्हणाले होते?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली हे मी आज सांगू शकणार नाही. मलाही त्याची कल्पना नाही. परंतु निश्चित मनसेने एक थोडी वेगळी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. आपल्याला हे स्पष्टपणे दिसतं आहे, असं भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

राज्यात एक मोठी पोकळी तयार होत आहे. मी त्याबाबत बोलणार नाही. मात्र, राजकारणात काहीही अशक्य नाही. सध्या काय काय सुरु आहे हे आपण पाहतो. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चालली आहे. ते कुणाच्याही मंचावर जातात बसतात. त्यामुळे राजकारणात काहीही कठीण नाही. मनसे आणि आम्ही तर एकाच विचाराचे आहोत. आमचे विचार टोकाचे किंवा वेगळे नाहीत, असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं होतं.

मनसेच्या एकमेव आमदाराचं काय मत?

सभागृहामधील परिस्थिती आपण बघत आहात. त्यामुळे भविष्यात मनसे भाजप एकत्र येऊ शकतात. सध्या जे राजकारण सुरू आहे ते तुम्ही पाहत आहात. मात्र, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये काय घडलं याची कल्पना नाही, असं कल्याण ग्रामीण मधील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील म्हणाले होते.