Imtiaz Jaleel : ‘तुमच्या विनयशिलतेनं सर्व नाराजांना चपराक’, इम्तियाज जलील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं कौतुक

| Updated on: Jun 22, 2022 | 8:02 PM

मी राजीनामा द्यायला तयार आहे, मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. पण आमदारांनी माझ्याशी समोर येऊन बोलावं, समोर मागणी करावी. इतकंच नाही तर शिवसेना पक्षप्रमुखपदही मी सोडेल, पण शिवसैनिकांनी मला येऊन सांगावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Imtiaz Jaleel : तुमच्या विनयशिलतेनं सर्व नाराजांना चपराक, इम्तियाज जलील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं कौतुक
इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेतही भूंकप झालाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे. मी राजीनामा द्यायला तयार आहे, मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. पण आमदारांनी माझ्याशी समोर येऊन बोलावं, समोर मागणी करावी. इतकंच नाही तर शिवसेना पक्षप्रमुखपदही मी सोडेल, पण शिवसैनिकांनी मला येऊन सांगावं, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या या संबोधनानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. तुमच्या विनयशिलतेनं सर्व नाराजांना जोरदार चपराक लागल्याचं ट्विट जलील यांनी केलंय.

‘मुख्यमंत्र्यांचं कौतुक करा. आमचे शिवसेनेशी राजकीय किंवा वैचारिक मतभेद आहेत. पण आज उद्धव ठाकरे यांना ऐकल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे. तुमच्या विनयशिलतेनं तुमच्या पक्षातील सर्व नाराजांना जोरदार चपराक बसली, असं ट्वीट इम्तियाज जलील यांनी केलंय.

सकाळी जलील यांची शिवसेनेवर टीका

ज्या पद्धतीने हे सर्व होत आहे, त्यावरून एकनाथ शिंदे एकटे नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार गुजरातला जातात आणि सरकारला हे लक्षातही येत नाही, असे होऊ शकत नाही. सर्व आमदारांना पोलिसांचे संरक्षण होते. त्या पोलिसांचे काम काय आहे? नियमाप्रमाणे पोलिसांना आपले कार्यक्षेत्र सोडताना हेडक्वार्टरला कळवावे लागते, की आमचे आमदार याठिकाणी चालले आहे, जावे की नाही, अशी परवानगी घ्यावी लागते. मात्र इथे असे काहीच दिसत नाही, असं वक्तव्य करत जलील यांनी शिवसेनेवरच संशय व्यक्त केला होता.

30, 35, 40 आमदार मुंबईहून गुजरातला गेले आणि या सरकारमधील कोणालाच माहीत नाही, असा सवाल करत बळजबरीने नेल्याचा आरोप काही जणांनी केला. त्यावर ते म्हणाले, की बळजबरीने न्यायला काय पिशवीत भरून नेले होते का, असा प्रतिप्रश्न केला. सरकार आणि मुख्यमंत्री गाफील राहिले का, असे विचारले असता, त्यांनी या सर्व कटात शिवसेना सामील असल्याचा आरोपही त्यांनी केला.