
उस्मानाबाद : राज्यातील नाट्यमय सत्तातरानंतर (Eknath Shinde) शिंदे गटातील आमदार यांना आता (Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. तर त्यांचे समर्थक हे नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी देवीला साकडे घालत आहेत. शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर (Tanaji Sawant) आ. तानाजी सावंत यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यासाठी सावंत समर्थकांनी तुळजाभवानी व धारासूर मार्दीनी मातेची महाआरती करीत देवीला साकडे घातले. मागील मंत्रिमंडळात उस्मानाबाद जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेक विकास कामे खोळबली होती. कृषी, सिंचन, उद्योगसह अन्य कामे मार्गी लावण्यासाठी सावंत यांचा समावेश मंत्रिमंडळात करावा अशी मागणी करीत साकडे घातले.आई राजा उदो उदो, जय भवानी जय शिवाजी, सावंत व शिवसेनेचा विजय असो अश्या घोषणा दिल्या.
डॉ. तानाजी सावंत यांनी भूम परंडा वाशी सह उस्मानाबाद यवतमाळ मतदार संघात कोट्यावधी रुपये खर्च करुन शिवजल क्रांतीच्या माध्यमातून जलसिंचन व जलसंधारणाची कामे केली. जवळपास 150 किमी खोलीकरण कामे करुन त्या योजनेला बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती असे नाव दिले, या योजनेमुळे या भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटून हरीतक्रांती झाली. सामूहिक विवाह सोहळे, शेतकरी कुटुंबातील मुलींचे लग्न लावून कन्यादान, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक, शैक्षणिक मदत करीत आधार दिला. अनेक मुलांना शिक्षण व नौकरीची संधी दिली यासह अनेक विकासकामे स्वखर्चाने केली.
सावंत हे शिवसेना भाजप युतीच्या काळात शेवटची 4 महिने जलसंधारण मंत्री व उस्मानाबादचे पालकमंत्री होते त्या काळात पीक कर्ज वाटप प्रमाण वाढले तसेच महिला बचत गट सक्षमीकरण झाले यासह अन्य कामे झाली. आजवर उस्मानाबादला मंत्रिपद मिळालेच नाही शिवाय इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री करण्यात आले त्यामुळे हक्काच्या माणसाला मंत्रिपद व पालकमंत्री करावे अशी मागणी सावंत समर्थक सुरज साळुंके यांनी केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा,भूम या शहरात सावंत समर्थकांनी बंडखोरीनंतर मोठी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले होते. मागील मंत्रिमंडळात सावंत यांना राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून डावलण्यात आले होते. तसेच राष्ट्रवादीचे मंत्री मतदार संघातील विकास कामे जाणीवपूर्वक अडवत होती. तसेच निधी कपात करणे असे प्रकार करत होते. स्थानिक राष्ट्रवादीचे त्रास देत असल्याच्या व्यथा मांडल्या व सावंत यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले. सावंत जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण, आम्ही सदैव तुमच्या सोबत असा हुंकार देत हे कार्यकर्ते एकवटले व रस्त्यावर उतरले होते.