कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र पंकजा मुंडेंच्याविरोधात जाऊ शकतं का?; वाचा सविस्तर

| Updated on: Jul 11, 2021 | 1:53 PM

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराज नसल्याचा खुलासाही केला. (pankaja munde)

कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र पंकजा मुंडेंच्याविरोधात जाऊ शकतं का?; वाचा सविस्तर
पंकजा मुंडे
Follow us on

मुंबई: भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराज नसल्याचा खुलासाही केला. मात्र, त्यानंतर पंकजा समर्थक नाराजांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पंकजा यांना दिल्लीतून बोलावणं आल्याने कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र पंकजा यांच्यावर बुमरँग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (is supporter resignation can boomerang on pankaja munde?)

पंकजा काय म्हणाल्या होत्या?

नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी 9 जुलै रोजी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही, हे स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते. त्यामुळे आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचं नाव चालतं. त्यामुळे आमचं नाव चाललं. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती, असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.

49 समर्थकांचे राजीनामे

बीड जिल्ह्यातील मुंडे भगिनींचे समर्थक असलेले भाजप पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचे समोर येत आहे. 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामा देण्यापूर्वी एकूण 14 भाजप पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. आतापर्यंत पंकजा यांच्या 49 समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी समर्थकांची मुंबईत बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी ही बैठक होणार असल्याचं भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले. त्यामुळे पंकजा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

राजीनामा सत्र बुमरँग होईल असं वाटत नाही

पंकजा समर्थकांचं राजीनामा सत्र बुमरँग पंकजांवर बुमरँग होईल असं वाटत नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलं. त्यांनी पक्ष किंवा नेत्यांविरोधात काहीच विधान केलं नाही. पण महाराष्ट्रात ओबीसी राजकारणाचं ध्रुवीकरण चाललं आहे. त्यामुळे त्यांना आपली ताकद दाखवावीच लागले. नाही तर त्या कालबाह्य होतील. खडसे पक्षातून गेले, त्यांना साईडलाईन केलंय, प्रीतम यांनाही साईडलाईन करण्यास सुरुवात झालीय, असं त्यांना वाटतंय. ज्यांना त्यांच्या वडिलांनी मोठं केलं, त्या लोकांना मंत्रिपद दिलं जातंय, याची खदखद त्यांच्या मनात असणं स्वाभाविक आहे, असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभिमन्यू शितोळे यांनी सांगितलं.

संसदीय बोर्डात संधी दिली जाऊ शकते

समर्थकांचे राजीनामे हा प्रेशर टॅक्टिसचा भाग असू शकतो. त्यामुळे त्यांना दिल्लीत बोलावलं असावं. तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा, असं त्यांना सांगितलं जाऊ शकतं. किंवा पुढच्या काळात संघटनेत तुम्हाला अॅडजस्ट केलं जाईल असंही सांगितलं जाऊ शकतं. भाजपच्या संसदीय बोर्डात चार जागा रिकाम्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातून फडणवीसांचं नाव संसदीय बोर्डासाठी चाललं होतं. पण ते दिल्लीत जाण्यास इच्छूक नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे किंवा प्रीतम यांना संधी दिली जाऊ शकते, त्यावरही आज चर्चा होऊ शकते, असंही शितोळे यांनी सांगितलं. पंकजा यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही. यूपी निवडणुकीनंतर लोकसभेत यूपी आणि महाराष्ट्रावर भाजपची मदार आहे. महाराष्ट्रात आघाडी एकत्र लढल्यास भाजपला अडचण होऊ शकते. त्यातच पंकजाची नाराजी आणखीनच कोंडी करणारी ठरू शकते. त्यामुळे जेवढं डॅमेज कंट्रोल करता येईल तेवढं केलं जात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पंकजा यांची भाषा आव्हानाची

‘दिव्य मराठी’चे राजकीय पत्रकार अशोक अडसूळ यांनीही पंकजा यांच्या समर्थंकांच्या राजीनामा सत्रावर मत व्यक्त केलं. फडणवीसांचा दिल्लीत अजूनही प्रभाव आहे. त्यामुळे वंजारी समाजातून दुसरं पर्यायी नेतृत्व उभं करण्याचा भाजपचा पर्याय दिसतोय. याची दोन उदाहरणे सांगता येतील. पंकजा यांना विधान परिषदेला उमेदवारी भरायला सांगितली. पण ऐनवेळी रमेश अप्पा कराड यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला. त्यानंतर आता प्रीतम यांचा पत्ता कट करण्यात आला. पंकज यांना पाडण्याचा पक्षातूनच प्रयत्न झाला होता हे उघड आहे. ज्या ज्या वेळी पंकजा यांनी पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्यांना सेटबॅक बसला आहे. परवाच्या पत्रकार परिषदेतून त्यांनी अनेक बिटवीन द लाईन देण्याचा प्रयत्न केला. पक्षात मी पणा चालत नाही, असं त्या म्हणाल्या. तो फडणवीसांना टोला होता. प्रीतम योग्य आहेत, त्यांनी चांगलं काम केलं असंही त्यांनी ठासून सांगितलं. या सर्व बिटवीन द लाईन आहेत. त्या भाजपला अजूनही आव्हान देत आहेत आणि फडणवीसांना तर थेट आव्हान देत असल्याचं परवाच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट होतं. त्यामुळे त्याचा त्यांना अजूनही सेटबॅक बसू शकतो, असं अशोक अडसूळ यांनी सांगितलं.

समज देण्यासाठीच दिल्लीतून बोलावणं

त्यांना समजावण्यासाठीच दिल्लीत बोलावलं गेलं असेल. कार्यकर्त्यांना समजावण्याच्या सूचनाही त्यांना दिल्या जाऊ शकतात. कधी कधी नेतेही आपल्या कार्यकर्त्यांना थोपवत नाहीत. तेही आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, असंही अडसूळ यांनी स्पष्ट केलं. (is supporter resignation can boomerang on pankaja munde?)

 

संबंधित बातम्या:

पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना, जेपी नड्डांशी चर्चा करणार; तर्कवितर्कांना उधाण

मुख्य निवडणुका होण्याआधीच इम्पिरीकल डेटा पूर्ण करा, नव्या मंत्र्यांकडून ओबीसींच्या खूप अपेक्षा: पंकजा मुंडे

एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी; पंकजा मुंडे म्हणाल्या…

(is supporter resignation can boomerang on pankaja munde?)