‘जनतेला वाऱ्यावर सोडून सत्ताधारी मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त, जनतेचे प्रश्न सभागृहात मांडणार’; जयंत पाटलांचा सरकारला इशारा

| Updated on: Aug 11, 2022 | 4:50 PM

माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. सत्कार सोहळ्यात व्यस्त न राहता मंत्र्यांनी जनतेच्या सेवेत लवकरात लवकर रुजू व्हावं, असं आवाहनही पाटील यांनी सर्व मंत्र्यांना केलं आहे.

जनतेला वाऱ्यावर सोडून सत्ताधारी मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त, जनतेचे प्रश्न सभागृहात मांडणार; जयंत पाटलांचा सरकारला इशारा
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन (Cabinet Expansion) करण्यात व्यस्त होते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. सत्कार सोहळ्यात व्यस्त न राहता मंत्र्यांनी जनतेच्या सेवेत लवकरात लवकर रुजू व्हावं, असं आवाहनही पाटील यांनी सर्व मंत्र्यांना केलं आहे.

17 ऑगस्टपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार असल्याचे संकेतच पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले.आज विधानभवनात विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सभागृहात मांडणार असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘..तर तो त्यांचा हिंदुत्वासाठी त्याग असेल’

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच या सरकारमध्ये वाद होते. त्यामुळे महाराष्ट्रात लोक पुराने झोडपले गेले पण त्यांच्याकडे कुणी लक्ष दिले नाही. आता सरकारनं याकडे लक्ष द्यावं. शिंदे गटातील ज्यांना कमी महत्वाचं खातं मिळेल त्यांच्या तो हिंदुत्वासाठीचा त्याग असेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावलाय. राज्यातील जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही अधिवेशनात मांडणार. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे बुधवारी त्यांना भेटायला गेलो होतो, ही सदिच्छा भेट होती, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

अधिवेशनाचा कालावधी वाढवा, पाटलांची मागणी

जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असून अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे अधिवेशन वाढवण्यात यावे अशी मागणी होती. गेल्या 40 दिवसापासून राज्याच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गोगलगायींचे आक्रमण वाढले आहे, मात्र सरकार अजूनपर्यंत तिथे पोहोचले नाही, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.