तक्रार करण्याआधी ‘ती’ महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटली, जयंत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट!

| Updated on: Nov 14, 2022 | 3:23 PM

राष्ट्रवादीचा एक नेता खंबीरपणाने लढत असेल तर सत्तारुढ पक्षाला ते अडचणीचे झाले आहेत, हेच यातून दिसतंय, असा आरोप जयंत पाटील यांनी केलाय.

तक्रार करण्याआधी ती महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटली, जयंत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटली होता, असा गौप्यस्फोट जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षाची तसेच जितेंद्र आव्हाड यांची या प्रकरणावरून सविस्तर भूमिका मांडली. मुंब्रा येथे घडलेला प्रकार नेमका काय होता आणि यावरून थेट विनयभंगाची तक्रार दाखल होणं निंदनीय असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय.

मुंब्रा येथे वाय ब्रीजच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. रात्रीच्या वेळी शिंदे हे गाडीत होते. त्यांच्याभोवती प्रचंड गर्दी होती. तेथेच जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भेट घेतली. तसेच तिथून बाहेर निघत असताना सदर भाजप महिला गर्दीतच होती. आव्हाड यांनी तिला बाजूला केले. तुम्ही इथे गर्दीत काय करताय, असा सवाल केला.. .याच प्रकारावरून सदर महिलेने आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप केलाय.

आव्हाड यांनी विशिष्ट हेतूने हा स्पर्श केल्याचा आरोप सदर भाजप पदाधिकारी रीदा राशिद यांनी केलाय. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाडीत बसले असताना एवढे लोक असताना एखादी व्यक्ती विनयभंग कसा करू शकते, असा उलट सवाल जयंत पाटील यांनी केलाय.

तसेच ही घटना घडल्यानंतर रात्री 12 वाजेनंतर सदर महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या दरम्यान ती महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटली, अशी माहितीही मिळाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे आव्हाड यांच्याविरोधात कोण षडयंत्र रचतंय, हे कळण्यासाठी महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे, असं वक्तव्य पाटील यांनी केलंय.

जयंत पाटील म्हणाले, ‘ मी इतर कोणतेही गुन्हे दाखल झालेले चालतील मात्र ३५४ सारखा गुन्हा दाखल होणं म्हणजे राजकारणाने किती खालची पातळी गाठली आहे, या वेदनेने आव्हाड व्यथित झाले आहेत…

एखाद्याच्या सार्वजनिक जीवनात, वैयक्तिक जीवनात सर्व यंत्रणा उभ्या करणं, हे चुकीचं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड असं चित्र होतंय. ठाण्यातील बहुतांश जनतेची सहानुभूती जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे. कारण त्यांची यात कुठलीही चूक दिसत नाही. मुख्यमंत्रीही बघत होते, असं जयंत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री गाडीत बसले असताना अशी कृती कुणी करू शकतं का? एवढी गर्दी तिथे आहे. पोलीस आहेत.. त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्राने सरकार कसं चाललंय, याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यावर महाराष्ट्र विचार करेल, असा माझा विश्वास आहे, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय.

जितेंद्र आव्हाड यांनी माझ्याकडे विधानसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा दिला आहे. मी समजूत घातली. मात्र आम्ही अजून यावर निर्णय घेणार आहोत. जितेद्र आव्हाड यांना सतत अडचणीत आणणं. राष्ट्रवादीचा एक नेता खंबीरपणाने लढत असेल तर सत्तारुढ पक्षाला ते अडचणीचे झाले आहेत, हेच यातून दिसतंय, असा आरोप जयंत पाटील यांनी केलाय.