पत्रकार ते आमदार, कशी आहे कपिल पाटील यांची राजकीय वाटचाल?; वाचा सविस्तर!

| Updated on: Aug 23, 2021 | 7:30 AM

लोकभारतीचे नेते आणि आमदार कपिल पाटील हे राज्यातील अभ्यासू आमदारांपैकी एक आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या पाटील यांचा व्यासंग मोठा आहे. (journalist turned politician, know about kapil patil)

पत्रकार ते आमदार, कशी आहे कपिल पाटील यांची राजकीय वाटचाल?; वाचा सविस्तर!
kapil patil
Follow us on

मुंबई: लोकभारतीचे नेते आणि आमदार कपिल पाटील हे राज्यातील अभ्यासू आमदारांपैकी एक आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या पाटील यांचा व्यासंग मोठा आहे. समाजकारण ते पत्रकार आणि पत्रकार ते राजकारण असा त्यांचा प्रवास राहिला आहे. समाजवादी विचारांचा साथी, शिक्षकांसाठी भांडणारा नेता, अभिनव पद्धतीने आंदोलन करणारा नेता, पुरोगामी चळवळीचा दुवा अशी त्यांची ओळख आहे. कपिल पाटील यांच्या राजकीय जीवनप्रवासावर टाकलेला हा प्रकाश. (journalist turned politician, know about kapil patil)

कपिल पाटील यांनी 26 जून 2006 रोजी पहिल्यांदा मुंबई शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला. तेव्हापासून म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून ते विधानपरिषदेत शिक्षकांचं प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्यावर एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु लिमये आणि राम मनोहर लोहिया यांच्या विचाराचा प्रभाव आहे. समाजवादी विचारांवर त्यांची प्रचंड निष्ठा आहेच. म्हणूनच कोणत्याही प्रलोभनाला ते बळी पडत नाही.

विलासराव म्हणाले, तो समाजवादी आहे, घर घेणार नाही

शक्य असतानाही त्यांनी मंत्रिपद मिळावं म्हणून प्रयत्न केले नाहीत. एवढेच काय तर आमदारांच्या राजयोग सोसायटीत मिळालेलं घरही त्यांनी नाकारलं होतं. कारण त्यांच्या समोर आदर्श होता समाजवादी नेत्यांचा. त्यांनी अलिशान घर नाकारल्यानंतर ज्येष्ठ मंत्र्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना फोन केला. कपिल पाटील यांना घर घेण्यास सांगण्याची विनंती करायला सांगितलं. त्यावर ‘अरे तो समाजवादी आहे. त्याला नका सांगू घर घ्यायला. तो ऐकणार नाही,’ असं खुद्द विलासराव म्हणाले. खरंतर विलासरावांनी दिलेलं हे त्यांच्या प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेटच होतं.

दिलीप कुमार यांच्याकडून प्रोत्साहन

कपिल पाटील हे मूळचे पत्रकार आहेत. दैनिक ‘आपलं महानगर’ आणि ‘आज दिनांक’मधून त्यांनी पत्रकार, संपादक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला होता. पत्रकारितेत येण्यापूर्वीपासूनच राजकारण आणि समाजकारणात ते कार्यरत होते. तरुण वयात ते ओबीसी नेते जनार्दन पाटील यांच्यासोबत मंडल आयोगाच्या अंमलबजावणासाठी अनेक आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी शब्बीर अन्सारी यांच्यासोबत मुस्लिम ओबीसी संघटना उभारण्याचं काम सुरू केलं होतं. त्यांच्या या कार्याला ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचंही प्रोत्साहन मिळत होतं.

अभिनव आंदोलने करणारा नेता

कपिल पाटील यांनी अनेक आंदोलने केली आहेत आणि अभिनव पद्धतीने आंदोलने केली आहेत. त्यामुळे अभिनव पद्धतीने आंदोलन करणारा नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. कॅपिटेशन फी विरोधी कायद्यासाठीचं आंदोलन असो, बीएड, डीटीएड विद्यार्थ्यांचं आंदोलन असो, सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठीचं आयोजन असो प्रत्येक लढ्यात ते पुढे होते. कर्मवीर भाऊराव पाटील जन्मशताब्दी कार्यक्रमाचं आयोजन, महात्मा फुले गौरव शताब्दी कार्यक्रमांचे आयोजन आणि अंधश्रद्धा निर्मूलन यात्रेचं आयोजन आदी कार्यक्रमही त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाने यशस्वी ठरले आहेत. रात्रशाळा वाचवण्यासाठी त्यांनी काढलेला बॅटरी मार्च ऐतिहासिक ठरला आहे. सरकारला जागं करण्यासाठी त्यांनी हे प्रतिकात्म आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष रात्रशाळेच्या प्रश्नाकडे वेधून घेतलं होतं.

पुरोगामी चळवळींचे ‘साथी’

कपिल पाटील हे नेहमी पुरोगामी चळवळीतील दुवा राहिले आहेत. त्यांचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी जेवढे जवळचे संबंध आहेत. तेवढेच रिपब्लिकन नेते रामदास आठवले आणि कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांच्याशीही आहे. आंबेडकरी, कम्युनिस्ट आणि समाजवादी चळवळीला सांधणारे ‘साथी’ म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. कपिल पाटील यांनी लोकभारती नावाची राजकीय-सामाजिक संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम ते करत असतात. तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या पाटील यांच्या लोकभारतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या. त्यांचे काही नगरसेवकही निवडून आले होते.

आमदार म्हणून पाटील यांची कामे

>> शिक्षकांना 1 तारखेला पगार मिळवून देण्यात सिंहाचा वाटा
>> महिलांना 180 दिवसांची मॅटर्निटी लिव्ह मंजूर करून घेतली
>> मतदार नसणाऱ्याही 9 हजार वस्तीशाळा शिक्षकांना आर्थिक व सामाजिक मान मिळवून दिला.
>> पाटील यांच्या प्रयत्नामुळे इयत्ता नववी आणि दहावीचा विज्ञान आणि गणिताचा अभ्यासक्रम सीबीएसईच्या दर्जाचा बनवला गेला.
>> खासगी विद्यापीठाला सभागृहात विरोध करणारे ते एकमेव आमदार आहेत. हा विरोध करताना दलित, वंचित घटकातील मुलांना या विद्यापीठात प्रवेश मिळेल काय? असा खडा सवाल त्यांनी विचारला होता.
>> अंधश्रद्धा निर्मूलनाचे विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी केलेल्या शिफारसी उपयुक्त ठरल्या.
>> शिक्षण सेवक योजनेला त्यांनी केलेल्या विरोधामुळे सरकारला माघार घ्यावी, त्यानंतर टिचर्स ऑन प्रोबेशन असं नाव देऊन शिक्षण सेवकांचे मानधन दुप्पट करण्यात आलं.
>> कोव्हिड काळात शिक्षकांचा पगार 50 ते 75 टक्के कापण्याचा घाट सरकारने घातला होता. सरकारचा हा निर्णय त्यांनी उधळून लावला होता. (journalist turned politician, know about kapil patil)

 

संबंधित बातम्या:

मतदारांच्या ‘कार्यसम्राट आमदार’; वाचा, कसा आहे मोनिका राजळेंचा राजकीय प्रवास!

अन् सासऱ्यांचीही कोंडी झाली… नेमकं काय घडलं?; वाचा राजकारणातले ‘संग्राम’ जगताप!

पान टपरीवाला ते आमदार; ‘आपला कामाचा माणूस’ अण्णा बनसोडेंबद्दल घ्या जाणून!

(journalist turned politician, know about kapil patil)