आधी मोदी सरकारवर घणाघात, नंतर मोदी-शाहांची भेट, 14 दिवसात ज्योतिरादित्य शिंदेंचा यूटर्न

| Updated on: Mar 10, 2020 | 3:49 PM

Jyotiraditya Scindia meets Modi Shah

आधी मोदी सरकारवर घणाघात, नंतर मोदी-शाहांची भेट, 14 दिवसात ज्योतिरादित्य शिंदेंचा यूटर्न
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारासाठी मोदी सरकारला जबाबदार ठरवणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी अवघ्या 14 दिवसात यूटर्न घेतला आहे. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे आता भाजपच्या वाटेवर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या साथीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर शिंदेंनी काँग्रेसचा राजीनामा दिला. Jyotiraditya Scindia meets Modi Shah

सीएएच्या मुद्द्यावरुन दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचाराबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांनी 25 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं होतं. त्यानंतर 26 फेब्रुवारीला त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीला हजेरी लावली आणि 2 मिनिटे मौन बाळगून हिंसाचारात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजलीही वाहिली होती.

केंद्राच्या धोरणांमुळे दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या वेळी परिस्थिती आणखी चिघळली, असा आरोपही ज्योतिरादित्य शिंदेंनी 14 दिवसांपूर्वी केला होता.

काँग्रेस सरकार वचननाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली होती.

(Jyotiraditya Scindia meets Modi Shah)

राज्यसभेची उमेदवारी आणि मध्य प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन बिनसल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी पक्षाची दोन दशकांची साथ सोडली. ज्योतिरादित्य शिंदे यांचे गांधी परिवाराशी अत्यंत जवळचे कौटुंबिक नाते होते. ते राहुल गांधी यांचे विश्वासू मानले जात असत. त्यामुळे त्यांचा राजीनामा भुवया उंचावणारा आहे.

हेही वाचा : नऊ वेळा खासदार, विमान अपघातात मृत्यू, ज्योतिरादित्यांचे पिता माधवराव शिंदेंची कहाणी

शिंदेंनी हा वर्षभरातील विचारपूर्वक निर्णय असल्याचं सांगितलं आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसनेही तडकाफडकी परिपत्रक काढत पक्षविरोधी कारवायांबद्दल त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा केली.

काँग्रेसच्या 19 आमदारांनीही राजीनामे दिल्याने, मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आहे. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवून, त्यांना थेट केंद्रात मंत्रिपद देण्याच्या तयारीत आहे.

कोण आहेत ज्योतिरादित्य शिंदे?

ज्योतिरादित्य शिंदे हे अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं. नंतर देहरादूनच्या प्रसिद्ध दून स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतलं. यानंतर ते साडेसात वर्ष अमेरिकेत राहिले आणि नोकरी केली. त्यांचे वडील माधवराव शिंदे यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर ज्योतिरादित्य राजकारणात आले.

गुना या मध्य प्रदेशातील मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांनी 2002 साली निवडणूक लढवली आणि निवडून आले. आतापर्यंत ते सलग 4 वेळा निवडून आले आहेत. 2012 ते 2014 या काळात त्यांना यूपीए सरकारमध्ये मंत्रिपदही देण्यात आलं होतं. त्यांची आत्या वसुंधरा राजे या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री होत्या. तर यशोधरा राजे मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री होत्या.

राजघराण्यातील असूनही साधं राहणं, सौम्य संवाद, उदार मन आणि सरळ स्वभाव हे ज्योतिरादित्य शिंदे यांचं वैशिष्ट्य आहे. पक्षातील युवा नेता म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली होती.

Jyotiraditya Scindia meets Modi Shah