Kolhapur | ‘पुन्हा महाडिकांचा नाद करायचा नाही’, तर सतेज पाटील यांच्याकडून रोखठोक उत्तर, राजकारण तापलं

कोल्हापुरात महाडिक गटाचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या घडामोडी घडत आहेत. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल हा महाडिक गटाच्या बाजूने झुकताना दिसतोय. विशेष म्हणजे निकालात आपली बाजू भक्कम असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता महाडिक गटाने बंटी पाटलांना डिवचलं आहे. त्यावर बंटी पाटील यांच्याकडून रोखठोक प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Kolhapur | पुन्हा महाडिकांचा नाद करायचा नाही, तर सतेज पाटील यांच्याकडून रोखठोक उत्तर, राजकारण तापलं
| Edited By: Chetan Patil | Updated on: Apr 25, 2023 | 7:42 PM

कोल्हापूर : कोल्हापुरात महाडिक आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या गटातील वाद हा सर्वश्रूत असा आहे. विशेष म्हणजे कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या (Rajaram Sugar Factory Election Result) निमित्ताने दोन्ही गटातील वाद चांगलाच वाढला होता. दोन्ही गटाच्या बाजूने आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत होत्या. संपूर्ण कोल्हापुरातील राजकारण या निमित्ताने ढवळून निघालं होतं. अखेर या निवडणुकीचा निकाल हा महाडिक गटाच्या बाजूने लागताना दिसत आहे. त्यामुळे महाडिक गटात अतिशय उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे या निकालानंतर महाडिक गटाकडून आमदार सतेज पाटील यांना डिवचण्यात आलं आहे. त्याला सतेज पाटील यांच्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय.

या निवडणुकीचा पहिला निकाल आज दुपारी समोर आला. या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा विजय झाला. हा सतेज पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जातोय. कारण या निवडणुकीत सतेज पाटील यांनी महाडिक गटाला ललकारलं होतं. त्यानंतर दोन्ही गटात चांगलाच संघर्ष रंगलेला बघायला मिळाला. पण आता निकालात महादेवराव महाडिक यांचा विजय झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर महादेव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना डिवचणारं वक्तव्य केलं.

‘पुन्हा नाद करायचा नाही’

“महाडिकांच्या मागे आम्ही किती ताकदीने उभे आहोत हे सभासदांनी दाखवून दिलं. हा विजय सहजासहजी मिळाला नाही. त्यांनी पुन्हा महाडिकांचा नाद करू नये. आता दाखवलं आहे. अजून पाहायचं असेल तर बघा आम्ही तयार आहोत. त्याचे किती कंडके तुम्हीच बघा. एका लाकडाचे दहा कंडके पडलेत. गुरु-शिष्य नात्याबद्दल त्याला माहित आहे का? त्याला (सतेज पाटील) आता खान्देशला पाठवा”, अशी प्रतिक्रिया महादेवराव महाडिक यांनी दिली.

‘सतेज पाटील यांची उतरती कळा सुरू’

“सभासदांनी बंटी पाटील आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांचे कंडके पाडले. सतेज पाटील आणि त्यांच्या मोठ्या बंधूंनी सभासदांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण सभासदांनी त्यांना झिडकारलं आहे. सभासदांनी त्यांचे कंडके केले. विरोधकांनी विखारी प्रचार केला. पण अमल महाडिक यांनी विचारे प्रचार केला. महाडिकांना कधीच गुलाल लागणार नाही असं म्हणत होते. राज्यसभेनंतर आता पुन्हा एकदा आम्हाला गुलाल लागलाय. सतेज पाटील यांची उतरती कळा सुरू झाली आहे”, अशी खोचक प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली.

सतेज पाटील यांचं प्रत्युत्तर

महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिकांच्या टीकेला सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. “आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही त्याची काही कारणं आहेत. आमचे तगडे उमेदवार जाणीवपूर्वक बाद करण्यात आले. बाहेरचे काही वाढीव सभासद होते त्यामुळे हा पराभव झाला. पण आम्ही आमचा पराभव मान्य केला आहे. या निवडणुकीत प्रचाराची पातळी खाली गेली ती जायला नको होती. आता सत्ताधारी यांनी जी आश्वासनं दिली ती पूर्ण करावीत. आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या सभासदांच्या पाठीशी कायम राहणार”, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.

“निवडणुका होत असतात. यापुढे देखील होतील. एका निवडणुकीनं खचून जाण्याचं कारण नाही. निवडणुकीत हार-जीत ही होत असते. मला उतरती कळा लागली आहे की नाही ते जनता ठरवेल”, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

“सत्ताधाऱ्यांना अपेक्षित मतदान झालं नाही. वाढीव सभासद हाच मुद्दा महत्वाचा ठरला आहेत. खोटे आधारकार्ड तयार करून मतदान करण्यात आलं. खोटे आधारकार्ड असलेले 200 मतदार मागे गेले. कसबा बावड्यात गेल्यावेळी मतं मिळाली तितकीच मतं मिळाली. मृत सभासदांचे शेअर्स ट्रान्स्फर केले नाहीत, नाहीतर आणखी मतं वाढली असती”, असा दावा सतेज पाटील यांनी केला.

Follow Us