महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात कोकणातून कोणाची वर्णी?

| Updated on: Dec 02, 2019 | 3:11 PM

राणे परिवाराला रोखण्यासाठी शिवसेनेच्या आक्रमक नेत्यांना मंत्रिपद देण्याची रणनीती आखली जात आहे. तर रायगड आणि रत्नागिरीत वर्चस्व राखण्यासाठी तटकरे कुटुंब फील्डिंग लावत असल्याची चर्चा आहे.

महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळात कोकणातून कोणाची वर्णी?
Follow us on

रत्नागिरी : महाविकासआघाडीने सत्तास्थापन करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सात नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन-तीन दिवसात खातेवाटप जाहीर करण्याचे संकेत दिले. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाची वर्णी लागणार, कुठल्या प्रदेशातून कोणत्या नेत्याच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ (Konkan Ministers Mahavikas Aghadi) पडणार, याची चर्चा आता रंगू लागली आहे.

महाविकासआघाडीत कोकणातल्या नेत्याची वर्णी लागावी म्हणून लॉबिंग सुरु झालं आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी आपले पाय मजबूत करण्यासाठी वेगळा डाव टाकण्याच्या विचारात आहे. तर राणे परिवाराला रोखण्यासाठी शिवसेनेच्या आक्रमक नेत्यांना मंत्रिपद देण्याची रणनीती आखली जात आहे. रायगड आणि रत्नागिरीत वर्चस्व राखण्यासाठी तटकरे कुटुंब फील्डिंग लावत असल्याची चर्चा आहे.

रत्नागिरी जिल्हा – कोणाकोणाची नावं चर्चेत?

शिवसेना – रामदास कदम, उदय सामंत, भास्कर जाधव.
राष्ट्रवादी – चिपळूणचे आमदार शेखर निकम, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे

सिंधुदुर्ग जिल्हा – कोणाकोणाची नावं चर्चेत?

शिवसेना – नारायण राणेंना शह देण्यासाठी दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते.
आक्रमक नेते म्हणून वैभव नाईक यांच्या नावाचीही चर्चा

रायगड जिल्हा – कोणाकोणाची नावं चर्चेत?
राष्ट्रवादी – सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे
शिवसेना – अलिबागचे आमदार महेंद्र दळवी

राजकारणातले मुरब्बी नेते शरद पवार कोकणात (Konkan Ministers Mahavikas Aghadi) वेगळी खेळी करु शकतात, हे ओळखून राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे गतिमान झालेले पहायला मिळत आहेत. रत्नागिरी आणि रायगडवर कब्जा रहावा यासाठी तटकरे लॉबिंग करताना पहायला मिळत आहेत. पण तटकरेंना दोन जिल्ह्यात मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याने शरद पवार यांचे निकटवर्तीय शेखर निकम यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात, पंकजांची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होईल : संजय राऊत

शिवसेना आणि कोकण यांचं वेगळं नातं आहे. त्यामुळे कोकणातून मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांना आहे. राणे परिवाराला काटशह देण्यासाठी आक्रमक नेत्याला मंत्रिपद मिळू शकतं, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. त्यामुळेच भास्कर जाधव आणि उदय सामंत यांच्या नावाची चर्चा आहे.

कोकण हा सेनेचा बालेकिल्ला. राणेंना आणि भाजपला शह देण्यासाठी सेना कोकणात आपली ताकद मंत्र्यांच्या माध्यमातून वाढवणार हे नक्की. पण किंगमेकर असलेल्या राष्ट्रवादीचा गेम प्लॅन शिवसेनेसाठी डोकेदुखी (Konkan Ministers Mahavikas Aghadi) ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.