काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांचा पक्षाला रामराम

| Updated on: Sep 10, 2019 | 6:57 PM

कृपाशंकर सिंग हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. त्यातच या राजीनाम्यामुळे ते भाजपात जाणार हे निश्चित मानलं जातंय.

काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांचा पक्षाला रामराम
Follow us on

मुंबई : विधानसभेपूर्वी काँग्रेसला मुंबईत एकीकडे गटबाजीचं ग्रहण लागलंय, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग (Kripashankar Singh resigns) यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. कृपाशंकर सिंग (Kripashankar Singh resigns) यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा सोपवला. कृपाशंकर सिंग हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. त्यातच या राजीनाम्यामुळे ते भाजपात जाणार हे निश्चित मानलं जातंय.

गेल्या वर्षी गणेशोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंग यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. तेव्हाच त्यांच्या भाजप प्रवेशाचा अंदाज लावला जात होता. यावर्षीही मुख्यमंत्र्यांनी कृपाशंकर सिंग यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. लोकसभा निवडणुकीच्या काळातही कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

कोण आहेत कृपाशंकर सिंग?

कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते आहेत. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 साली कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. 2009 साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्याचं बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जातं, असं मानलं जातं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंग यांनी भूषवली आहेत.

मुंबईत काँग्रेसमध्ये गटबाजी पुन्हा उफाळली

कोणतीही निवडणूक असो, मुंबई काँग्रेसमधील गटबाजी ही नेहमीचीच झाली आहे. यावेळी विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. मिलिंद देवरा यांच्याजागी दुसरा मुंबई अध्यक्ष निवडण्यात आल्यानंतर संजय निरुपम यांच्या मनातील असुया बाहेर आली आणि हा निर्णय योग्यच असल्याचं ते म्हणाले. यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसला रामराम ठोकला. त्यामुळे पक्षाने आता संजय निरुपम यांच्यावर कारवाई करावी, कारण त्यांच्यामुळेच उर्मिला मातोंडकरने पक्ष सोडला, असं मिलिंद देवरा यांचं म्हणणं आहे.