सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा | राणे, केसरकर, वैभव नाईक, जिल्ह्यात कुणाचं पारडं जड?

| Updated on: Sep 09, 2019 | 11:59 AM

कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या  राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा | राणे, केसरकर, वैभव नाईक, जिल्ह्यात कुणाचं पारडं जड?
Follow us on

सिंधुदुर्ग :  कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या  राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी 2 शिवसेनेकडे तर एक काँग्रेसकडे आहे.

  1. कणकवली विधानसभा मतदारसंघ (Kankavli vidhan sabha)

कणकवली – देवगड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधून निवडून आलेले नितेश राणे हे विद्यमान आमदार आहेत. कणकवली – देवगड मतदारसंघ हा नेहमीच सत्ताधाऱ्यांच्याविरोधात राहिलेला मतदारसंघ आहे. इथे निवडून येणारा आमदार हा विरोधी पक्षाचा आमदार असतो. खरंतर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नितेश राणे यांनी हा मतदारसंघ खेचून घेतला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून 8 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं होतं. आगामी 2019 च्या  निवडणुकीसाठी ही अनेकांनी तयारी केली आहे.

2014 मध्ये भाजपच्या तत्कालिन  विद्यमान आमदार प्रमोद जठार यांचा पराभव करत काँग्रेसच्या नितेश राणे यांनी हा मतदारसंघ खेचून आणला. 2009 च्या निवडणुकीत भाजपचे प्रमोद जठार अवघ्या 34 मतांनी विजयी झाले होते. मात्र 2014 मध्ये नरेंद्र मोदींची सभा होऊनदेखील नितेश राणे यांनी प्रमोद जठार यांचा 26 हजार मतांनी पराभव केला. कणकवली- देवगड मतदारसंघात कणकवली, देवगड आणि वैभववाडी हे तीन तालुके येतात.

सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. पक्षांतर हा रोजचाच सोहळा बनला आहे. अशाच राणेही भाजपमध्ये आपला पक्ष विलीन करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2) कुडाळ विधानसभा मतदारसंघ (Kudal Vidhan sabha)

कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वैभव नाईक विद्यमान आमदार आहेत. वैभव नाईक यांनी  2014 मध्ये तत्कालिन काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. वैभव नाईक यांनी जवळपास 10 हजारांपेक्षा जास्त मतांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. यंदाही शिवसेनेकडून वैभव नाईकच या मतदारसंघातून मैदानात उतरणार यात शंका नाही. मात्र नारायण राणे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. भाजपच्या कोट्यातून ते राज्यसभेवर गेले. मात्र आता ते पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.

3) सावंतवाडी मतदारसंघ (Sawantwadi Vidhan sabha)

सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर हे विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या राजन तेली यांचा पराभव केला. यंदा शिवसेना भाजपची युती असल्याने हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे दीपक केसरकर हेच या मतदारसंघातून मैदानात उतरतील.

2014 मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे चंद्रकांत गावंडे आणि राष्ट्रवादीचे सुरेश दळवी हे चौथ्या क्रमांकावर होते.  त्यामुळे यंदा दीपक केसरकर यांच्यासमोर कुणाचं आव्हान असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.