‘शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर एक दिवसाचं उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा’, मनसेचं मलिकांना प्रत्युत्तर

| Updated on: Oct 11, 2021 | 12:54 PM

महाविकास आघाडीच्या बंदला मनसेने विरोध केला आहे. मग मनसेचा लखीपूरमधील हत्येला पाठिंबा आहे का?, असा सवाल नवाब मलिकांनी केलाय. नवाब मलिकांच्या या टीकेला आता मनसेच्या चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर एक दिवसाचं उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा, मनसेचं मलिकांना प्रत्युत्तर
अमेय खोपकर, नवाब मलिक
Follow us on

मुंबई : लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय. या महाराष्ट्र बंदला मनसेनं विरोध केलाय. मनसेच्या विरोधी भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केलीय. महाविकास आघाडीच्या बंदला मनसेने विरोध केला आहे. मग मनसेचा लखीपूरमधील हत्येला पाठिंबा आहे का?, असा सवाल नवाब मलिकांनी केलाय. नवाब मलिकांच्या या टीकेला आता मनसेच्या चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. (MNS leader Amey Khopkar criticizes NCP spokesperson Nawab Malik)

अमेय खोपकरांना महाविकास आघाडीवर निशाणा

जनतेच्या जीवाशी खेळ करुन राजकारणाची पोळी भाजणारी महाभकास आघाडी. उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनात जो दुर्दैवी प्रकार झाला त्याचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे, पण म्हणून ‘महाराष्ट्र बंद’ पुकारुन राज्य सरकार काय साध्य करतंय? गाड्यांची तोडफोड करणारे, जबरदस्ती करुन दुकानं बंद करायला लावणारे ही गुंडशाही का आपल्या उरावर बसलेय? कोरोनातून आत्ता कुठे सगळे सावरत असताना जखमेवर मीठ चोळणारे किती विकृत मनोवृत्तीचे असतील!

शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर एक दिवसाचं उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा. निषेध म्हणून दोन तास अधिक काम करा. जनतेशी दादागिरी कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच. #नाहीकरणारमाझामहाराष्ट्रबंद, अशा शब्दात खोपकर यांनी मलिकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

नवाब मलिकांचा मनसेला सवाल

राष्ट्रवादीच्या वतीने आज बंदच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौकात निदर्शने केली. यावेळी नवाब मलिकही उपस्थित होते. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मलिक यांनी लखीमपूरच्या हिंसेवरून मनसेला धारेवर धरले. लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे म्हणजे मविआने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?, असा सवाल मलिक यांनी केला.

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये कुठे अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची माहिती घेतली जाईल. या बंदला राज्यातील जनतेने चांगला पाठिंबा दिला आहे शिवाय राज्यातील व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याने सांघिक बंद यशस्वी झाल्याचा दावा करतानाच मलिक यांनी सर्व व्यापारी संघटनांचे आभार मानले आहेत.

इतर बातम्या :

शेतकऱ्यांनीही चार जणांना ठेचून मारलं, कारमध्ये मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही मारलं असतं : चंद्रकांत पाटील

Maharashtra Bandh | आशिष मिश्राला वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न, मिश्रावर 302 अंतर्गत तात्काळ कारवाई करा – नाना पटोले

MNS leader Amey Khopkar criticizes NCP spokesperson Nawab Malik