शिंदे सरकारची सर्वात मोठी परीक्षा, ‘हे’ आमदार आता दुसरी नवरी शोधतील, विजय वडेट्टीवार यांचं भाकित काय?

| Updated on: Nov 15, 2022 | 10:49 AM

शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदे गटाचं भवितव्यही यावर अवलंबून असेल, असं राजकीय जाणकार सांगतायत.

शिंदे सरकारची सर्वात मोठी परीक्षा, हे आमदार आता दुसरी नवरी शोधतील, विजय वडेट्टीवार यांचं भाकित काय?
Image Credit source: social media
Follow us on

वाशिमः राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion)दुसऱ्या टप्प्याची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. यामुळे एकिकडे अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्याने मोठं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) महायुतीच्या सरकारची लवकरच सर्वात मोठी परीक्षा होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्पात या सरकारचा कस लागणार आहे. यावर हे सरकार किती तग धरेल, हे ठरेल, असं भाकित काँग्रेसचे अनुभवी नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiewar) यांनी केलंय. त्यामुळे राज्यात पुन्हा मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांचं मोठं नाराजी नाट्य सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

वाशिममध्ये टीव्ही 9 शी विशेष बातचित करताना विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले, ‘मंत्रिमंडळाचा विस्तार हिच खरी परिक्षा आहे, मंत्री होण्यासाठी सर्वांनीच बाशिंग बांधून ठेवलंय, पण ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते दुसरी नवरी शोधातील. मंत्री होण्याचं सर्वांना आश्वासन दिलंय त्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्तारात जे मंत्री होणार नाही, ते दुसरी नवरी शोधणार. त्यांना महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही हे परिस्थितीनुसार ठरवू, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्रीच एक महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती आहे. या दोघांमध्ये जवळपास दीड तास मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य महत्त्वाचं आहे.

बच्चू कडूंनी केलेलं शक्ती प्रदर्शन, संजय शिरसाट यांची नाराजी तसेच इतरही आमदारांना दिलेली आश्वासनं यामुळे शिंदे सरकारचा या मंत्रिमंडळ विस्तारात खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदे गटाचं भवितव्यही यावर अवलंबून असेल, असं राजकीय जाणकार सांगतायत.

तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची मनं मात्र घट्ट जुळली आहेत, असं विजय विडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न झालाय, हे चुकीचं असल्याचं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. शेगाव येथील यात्रेत मोठं शक्तिप्रदर्शन होणार असं म्हटलं जातय. मात्र वडेट्टीवार म्हणाले, शेगावची सभा शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न नाही तर लोकांच्या आवाजाला बळ देण्याचा प्रयत्न, यात सहभागी होण्याचं खुलं आवाहन केलंय… इतक्या मोठ्या प्रमाणात अंतर पदयात्रा करणारा राहूल गांधी जगातला एकमेव नेता आहे..