ज्या गडावर माझ्यावर दगडफेक झाली, तिथेच भगवान बाबांनी मला न्याय दिला : धनंजय मुंडे

| Updated on: Jan 09, 2020 | 5:26 PM

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज भगवान गडावर जाऊन दर्शन घेतलं.भगवान बाबांनी मला न्याय दिला, असं धनंज मुंडे म्हणाले.

ज्या गडावर माझ्यावर दगडफेक झाली, तिथेच भगवान बाबांनी मला न्याय दिला : धनंजय मुंडे
Follow us on

अहमदनगर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज भगवान गडावर (Dhananjay Munde Bhagwangad) जाऊन दर्शन घेतलं. “आमचं सर्वांचं शक्तीस्थान भगवानगड आहे, मंत्री झाल्यानंतर महाराजांनी मला गडावर दर्शनाला येण्यासाठी आज्ञा केली होती. आज माझ्या जीवनातला सुवर्ण अक्षराने लिहावा असा दिवस आहे” अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली. (Dhananjay Munde Bhagwangad)

“2015 मध्ये माझ्या गाडीवर दगडे मारली होती. मात्र आज बाबांनी न्याय दिला. या महाराष्ट्रतील जनतेची सेवा करायला मिळो असा आशीर्वाद मी मागितला. या गडाचं नातं आज नाही तर अनेक पिढ्यांचं आहे, या गडाचा पाईक म्हणून मी आलो आहे, महाराष्ट्राची सेवा माझ्या हातून घडो”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

काही जणांनी ठरवले असेल गडाला दगडे मारावी आणि मला वेगळं करावं, मात्र बाबांकडे न्याय आहे तो न्याय मला आज जीवनात मिळाला. मला हा चमत्कार वाटतोय. इथली प्रेरणाशक्ती घेतली की ताकद मिळते. ही गडशक्ती पद न मागता अनेक गोष्टी झाल्या पाहिजे, हाच गड भगवान बाबांनी निर्माण केला आहे. मात्र काही जण राजकीय द्वेषपोटी दुसरा गड निर्माण करु पाहत आहेत. पण धर्मकरण धर्माच्या ठिकाणी  आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असावं, असं धनंजय मुंडे म्हणाले.

2015 मध्ये धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगडफेक

धनंजय मुंडे आणि भगवान गड हा वाद 2015 मध्ये मोठ्या प्रमाणात गाजला होता. तत्कालिन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर भगवान गडावर संतप्त जमावाकडून दगडफेकीचा प्रयत्न झाला होता. आक्रमक जमावामुळे धनंजय मुंडे यांना भगवानगडावरून माघारी परतावे लागले होते.

भगवान गडावर त्यावेळी सुवर्ण महोत्सवी सप्ताह सुरु होता. मात्र धनंजय मुंडे दर्शनासाठी भगवान गडावर गेले होते. त्यावेळी संतप्त जमावाने धनंजय मुंडे यांच्या गाडीवर जबरदस्त दगडफेक केली होती.

गडावरुन राजकारण नाही : धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी नारायण गडावर जाऊन आशीर्वाद घेतला. “आम्हाला कोणालाही वाटले नव्हते. मी मंत्री होईल मात्र आता मंत्री झालोय. त्यामुळे सर्वाधिक विकास बीड जिल्ह्याचा करायचा आहे. मी आज नारायणगडावर आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आशीर्वाद घेण्यापूर्वी रात्रीतून पालकमंत्रीपदाची घोषणादेखील झाली. आता कोणत्याही गडावरून कसलंच राजकारण नाही, तर विकास होईल”,असं धनंजय मुंडे म्हणाले.

गडावर जपून बोललं पाहिजे, दिलेला शब्द पाळला पाहिजे. असे सांगत मी पुन्हा येईल मात्र आशीर्वादासाठी नव्हे तर दिलेल्या शब्द पाळण्यासाठी असेही मुंडे यावेळी म्हणाले.

आम्ही जास्त होरपळलेले आहोत. संदीप क्षीरसागर यांचा काळ कमी होता. मात्र माझा काळ जास्त होता, असं सांगत मी उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा कधी टाकणार नाही, असा विश्वासदेखील धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलून दाखवला.

दर्शनासाठी बीडमधील गहिनीनाथ गडावर

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आज गहिनीनाथ गडावर जाऊनही दर्शन घेतलं.  “या गडाच्या आशीर्वादाने मला कठीण परिस्थिती साथ दिली. गडावर बोलण्याची माझी सवय नाही. 15 वर्षापूर्वी मी काय होतो जिल्हा परिषद सदस्य होतो की नाही मला माहित नाही पण याच गडाच्या महाराजांनी मला मुख्य पूजेचा मान दिला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान स्वीकारल्यानंतर इथली शक्ती, ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाणार आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार. तुम्ही पाहिला नसेल असा विकास करणार. ज्या काळात कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतं,ज्या काळात मला गद्दार म्हणत होते,ज्या काळात मला पाठीत खंजीर खुपसला म्हणत होते,ज्या काळात मला खलनायक म्हणत होते,त्या काळात मला गहिनीनाथ गड नायक समजत होता. शरद पवार साहेबांनी जबाबदारी दिली म्हणून काम करण्याची संधी मीळाली”, असं धनंजय मुंडे म्हणाले.