राजधानीत आज मोठी घडामोड, शिंदे-फडणवीस दिल्लीत, बोम्मईदेखील येणार, अमित शहांसमोर महत्त्वाची बैठक

कर्नाटक सीमाप्रश्नावरील या बैठकीकडे दोन्ही राज्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय.

राजधानीत आज मोठी घडामोड, शिंदे-फडणवीस दिल्लीत, बोम्मईदेखील येणार, अमित शहांसमोर महत्त्वाची बैठक
Image Credit source: social media
| Updated on: Dec 14, 2022 | 9:01 AM

नवी दिल्लीः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka border issue) आज सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतील. विशेष म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील दिल्लीतल्या बैठकीला हजर राहणार आहेत. संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा होणार आहे, अशी माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली आहे.

राज्य पुनर्रचना कायदा लागू झाल्यानंतर उफाळलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर आतापर्यंत झालेल्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टात दाखल खटल्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दोन आठवड्यांपूर्वी सीमाप्रश्नी बसवराज बोम्मई यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. बेळगाव परिसरातील गावं कर्नाटकचीच असून महाराष्ट्रातील अक्कलकोट, सोलापूर, सांगलीतील इतरही गावांवर त्यांनी दावा सांगितला होता.

तसेच देवेंद्र फडणवीस याप्रकरणी चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सीमाभागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या बसेस तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेल्या बसेसला राजकीय संघटनांनी नुकसान पोहोचवत निषेध व्यक्त केला. यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

कर्नाटक सरकार बेमुर्वतखोरपणे वागत असले तरीही महाराष्ट्रातील सरकार मूग गिळून का बसले आहे, असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विचारला जातोय. आज या बैठकीत सीमाप्रश्नी काही तोडगा निघण्याची शक्यता आहे.

मंगळवारी बसवराज बोम्मई यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सीमावादावर चर्चेसाठी बोलावले आहे. या बैठकीत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू…

त्यामुळे कर्नाटक सीमाप्रश्नावरील या बैठकीकडे दोन्ही राज्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय.