Maharashtra Lockdown Update : राज्यात लॉकडाऊन की अनलॉक? सरकारमधील संभ्रमावस्थेवर फडणवीसांसह भाजप नेत्यांचा हल्लाबोल

| Updated on: Jun 03, 2021 | 8:24 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, केशव उपाध्ये यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

Maharashtra Lockdown Update : राज्यात लॉकडाऊन की अनलॉक? सरकारमधील संभ्रमावस्थेवर फडणवीसांसह भाजप नेत्यांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर
Follow us on

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन हटवण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत अनलॉकच्या 5 लेव्हल ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात उद्यापासून 18 जिल्ह्यात अनलॉक करण्यात येणार अशी घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर काही वेळातच नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलंय. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, केशव उपाध्ये यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. (BJP leaders criticize the confusion in the Thackeray government)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील संभ्रमावस्थेवर बोट ठेवत, जोरदार टीका केलीय. फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित करत सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचा खोचक टोला हाणलाय. काय सुरु, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद? अशी प्रश्नांची सरबत्ती करत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय.

सरकारमधील संभ्रमामुळे जनता भरडली जातेय- महाजन

महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये कुठेही समन्वय नाही. तीन पक्षत नाही तर एक-एका पक्षातील नेत्यांमध्येही समन्वय नाही. सरकारमध्ये फक्त श्रेयवादाची लढाई सुरु आहे. आधी निर्णय जाहीर करण्याची घाई करायची. मग मुख्यमंत्री कार्यालयानं त्यावर स्पष्टीकरण द्यायचं. काल मुंबईत रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला परवानगी म्हणून दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण केला. लॉकडाऊन बाबत तत्त्वत: मान्यता असूच कशी शकते. हे सरकार दिशाहीन बनलंय. या संभ्रमामुळे जनता भरडली जात आहे, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय.

‘तथाकथित विचारी मुख्यमंत्र्यांना बहुदा मंत्रीच विचारत नाहीत’

मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो तसं काही नाही हो… हे सरकार आहे की सर्कस? ठाकरे सरकारची जत्रा, त्यात कारभारी सतरा, गोंधळी सरकार, अनलॉकवरुन गोंधळ. तथाकथित विचारी मुख्यमंत्र्यांना बहुदा मंत्रीच विचारत नाहीत अशी स्थिती असल्याची टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केलीय.

जनतेला त्रासदायक श्रेयवाद का? – दरेकर

तुम्हाला एकमेकांशी बोलायलाही वेळ नाही का? सरकार म्हणून एकमतानं निर्णय घ्यायला हवा. मीडियासमोर यायचं म्हणून चुकीचा निर्णय काय सांगितला जातो. वडेट्टीवारांना सांगायचंच होतं तर त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा का केली नाही? किंवा मुख्यमंत्र्यांनीही वडेट्टीवारांना नेमकं काय सांगायचं ते सांगितलं नाही का? तुम्हीच संभ्रमित असाल तर जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही का? असा सवाल प्रविण दरेकर यांनी विचारलाय. राज्यातील शेतकरी, दुकानदार, व्यापारी यांच्यावर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. त्या सगळ्यांचा विचार करुन सरकार म्हणून एकत्र निर्णय अपेक्षित आहे. पण सरकारमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते वेगवेगळं सांगत सुटतात. हा श्रेयवाद कशासाठी? असा प्रश्नही दरेकरांनी सरकारला विचारलाय.

‘अंधेर नगरी चौपट राजा’

अंधेर नगरी चौपट राजा अशी अवस्था राज्याची महाआघाडी सरकार करत आहे. कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही. विजय वडेट्टीवार प्रेस घेऊन अनलॅाकडाऊन केल्याची घोषणा करतात. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतबैठकीत निर्णय झाल्याचे सांगतात, काहीवेळानतंर सरकारी प्रेसनोट येते अनलॅाकडाऊनचा प्रस्ताव आहे निर्णय नाही, असा खोटक टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावलाय.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown Update : अनलॉकच्या 5 लेव्हलला तत्त्वत: मान्यता, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार, वडेट्टीवारांचं घूमजाव!

Maharashtra Lockdown Update : ठाकरे सरकारचा गोंधळात गोंधळ, निर्बंध अद्याप हटवले नाहीत, CMO चं स्पष्टीकरण

BJP leaders criticize the confusion in the Thackeray government