
नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची (Maharashtra political crisis) सुनावणी आणखी फार काळ चालणार नाही. तारीख पे तारीख अशी स्थिती या केसची होणार नाही तर हा युक्तिवाद याच आठवड्यात संपवून निकालदेखील लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे तसेच ठाकरे गटातील आमदार-खासदारांची धाकधुक आणखी वाढली आहे. निवडणूक आयोगाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे एकमेश आशेचा किरण म्हणून ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे पाहिलं जातंय. त्यासोबतच सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जनताही या निकालाच्या प्रतीक्षेत आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अर्थात शिवसेना खटल्याचा निकाल याच आठवड्यात संपवायचा आहे, असं वक्तव्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलंय. त्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल हाती येण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक असल्याचं म्हटलं जातंय. कोर्टात आज ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि त्यानंतर देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. लंच ब्रेकनंतरही कामत यांचा युक्तिवाद सुरु राहील. त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवादाला सुरुवात करतील.