KKR vs MI : केकेआरसमोर मुंबईचं आव्हान, कोलकाता पलटणला पराभूत करणार?
Kolkata Knight Riders vs Mumbai Indian : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. केकेआरकडे हा सामना जिंकून गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत (IPL 2026) 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 हात करणार आहे. मुंबई आणि केकेआर या दोन्ही संघांनी 19 व्या हंगामात आतापर्यंत एकूण आणि प्रत्येकी 12 सामने खेळले आहेत. तर बुधवारी होणारा दोन्ही संघांचा 13 वा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. मुंबई या हंगामातून बाहेर झाली आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी मुंबईला विशेष फरक पडणार नाही. मात्र केकेआर प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्यामुळे केकेआरसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. केकेआरचं प्लेऑफमधील आव्हान स्वत:च्या हातात नाही. मात्र त्यांना प्लेऑफची शक्यता आहे. त्यामुळे केकेआर पलटण विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
केकेआर पराभवाचा हिशोब करणार का?
केकेआर आणि मुंबई दोन्ही संघांनी 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेची सुरुवात एकमेकांविरुद्ध केली होती. उभयसंघातील हा सामना 29 मार्च रोजी खेळवण्यात आला होता. मुंबईने घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात केकेआरवर एकतर्फी फरकाने मात करत 2012 नंतर आपला पहिला सामना जिंकला होता. केकेआरने मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं.
केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?
आता उभयसंघातील सामना हा केकेआरच्या घरच्या मैदानात इडन गार्डन्समध्ये होणार आहे. त्यामुळे केकेआर पलटणला लोळवून विजय मिळवून हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती
दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, केकेआर-मुंबई अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानी आहेत. केकेआरने 12 पैकी 5 सामने जिंकलेत. केकेआरला 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. तर कोलकाताचा पंजाब किंग्स विरुद्धचा 1 सामना हा पावसाने वाया गेला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला होता. केकेआरच्या खात्यात एकूण 11 गुण आहेत. तर मुंबईने 12 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर पलटणने 8 सामने गमावले आहेत. मुंबईच्या नावावर 8 गुण आहेत. आता उभयसंघात होणाऱ्या 13 वा सामन्यात कोण मैदान मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
