मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढवणार

| Updated on: Jul 23, 2019 | 1:09 PM

मराठा क्रांती ठोक मोर्चाने (Maratha Morcha) आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाचा व्हावा अशी भूमिका आता मराठा मोर्चाने घेतली आहे.

मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढवणार
Follow us on

मुंबई : मराठा क्रांती ठोक मोर्चाने (Maratha Morcha) आगामी विधानसभा निवडणूक (Maharashra Assembly election 2019) लढवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाचा व्हावा अशी भूमिका आता मराठा मोर्चाने (Maratha Morcha) घेतली आहे. त्यासाठी 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली.

मराठा आरक्षणानंतरही मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकारच्या भूमिकेवर समाधानी नाही. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा आपले उमेदवार उभे करणार आहे.

आरक्षण मिळालं असलं तरी मराठा समाजाचे अनेक प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवले आहेत, असा आरोप आहे.

“गेल्या 35 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून फक्त राजकीय फायद्यासाठी सर्वच पक्षाने वापर केला जातोय.  केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतिनिधी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीत. त्यामुळे ठोक मोर्चा येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे”, अशी माहिती मराठा मोर्चातर्फे देण्यात आली.

कोपर्डी घटनेतील आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर ताबडतोब अंमलबजावणी करावी, लागू झालेल्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी द्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक याबाबत सरकारने भूमिका अधांतरी ठेवली आहे, त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आलं आहे.

ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील आणि रमेश केरे पाटील यांनी ठोक मोर्चाची निवडणूक लढण्याबाबतची घोषणा केली.