‘आता शॉर्टकट उरला नाही, जस्टिस भोसले कमिटीच्या निर्णयाप्रमाणे जावं लागेल’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

| Updated on: Jul 01, 2021 | 9:46 PM

सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग खडतर असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावताना एक सल्लाही दिलाय.

आता शॉर्टकट उरला नाही, जस्टिस भोसले कमिटीच्या निर्णयाप्रमाणे जावं लागेल, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Follow us on

नागपूर : मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पूनर्विचार याचिका फेटाळली आहे. पाच जजेसच्या बेंचनं जो निर्णय़ दिला होता तोच निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 102 व्या घटनादुरुस्तीबाबत ही पुनर्विचार याचिका होती. ह्याच घटनादुरुस्तीनुसार राज्यांना एसईबीसी अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. त्यावर शिक्कामोर्तब झालंय. सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग खडतर असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावताना एक सल्लाही दिलाय. (Devendra Fadnavis advises Thackeray government for Maratha reservation)

फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला एक सल्ला दिलाय. पुनर्विचार याचिका दाखल केली तेव्हा आपण हे सांगितलं होतं की, पुनर्विचार याचिकेला फार कमी संधी असते. आपण जर जस्टिस भोसले यांच्या कमिटीने दिलेला निर्णय बघितला तर त्यात हे स्पष्टपणे दिलं आहे की, पुनर्विचार याचिकेला आपल्या मर्यादा असतात. त्यांनी स्वत: अनेक अभ्यास आणि संदर्भ देऊन हे सांगितलं आहे की, पुन्हा एकदा मागासवर्गीय आयोगाकडे कशाप्रकारे पाठवलं पाहिजे आणि मागच्या निर्णयात काय त्रुटी आहेत, हे सगळं त्यांनी तयार करुन दिलं आहे. मात्र, सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे. जस्टीस भोसले कमिटीच्या अहवालानुसार सरकार कुठलंही काम करत नाही. मला असं वाटतं की हे वेळकाढूपणाचं धोरण दूर केलं पाहिजे. मला हे माहिती आहे की, आता हा काळ मोठा आहे. आता शॉर्टकट उरला नाही. पण जस्टिस भोसले यांनी दाखवलेल्या मार्गाने चाललं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस केंद्रात जाणार?

देवेंद्र फडणवीस हे केंदात जाणार अशी चर्चा आहे. याबाबत विचारलं असता, आमच्या पक्षात आमचे नेते नरेंद्र मोदी जो आदेश देतील तो सर्वांसाठी शिरोधार्ह असतो. पण एक गोष्ट सांगतो की, ज्याला भाजपचं, महाराष्ट्राचं राजकारण कळतं त्याला हे कळून येईल की, मी महाराष्ट्रातून कुठेही जाण्याची ही वेळ नाही. माझ्या शुभचिंतकांना आनंद होतो की, मला दिल्लीत काही मिळेल. पण मी त्यांना सांगू इच्छितो की माझी दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. काही लोकांना वाटतं की हा दिल्लीला गेला तर बला टळेल पण बला टळणार नाही, हे देखील मी स्पष्टपणे सांगतो, असंही फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी: मराठा आरक्षणाबाबत मोदी सरकारनं दाखल केलेली पूनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

मराठा समाज त्यांच्या गाड्यांमागे धावला, त्यांनी समाजाला काय दिलं? चंद्रकांत पाटलांचा पवारांवर घणाघात

Devendra Fadnavis advises Thackeray government for Maratha reservation