Ashish Jaiswal : मंत्र्यांवर टक्केवारीच्या आरोपानंतर आमदार आशिष जयस्वाल ‘वर्षा’वर दाखल; सेना नेत्यांकडून जयस्वालांवर खास लक्ष!

| Updated on: Jun 06, 2022 | 7:52 PM

आशिष जयस्वाल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. जयस्वाल यांची नाराजी दूर करण्यसाठी शिवसेनेचे वरीष्ठ नेते त्यांच्याची चर्चा करत असल्याची माहिती मिळतेय.

Ashish Jaiswal : मंत्र्यांवर टक्केवारीच्या आरोपानंतर आमदार आशिष जयस्वाल वर्षावर दाखल; सेना नेत्यांकडून जयस्वालांवर खास लक्ष!
Follow us on

मुंबई : मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच आमदारांना निधी दिला जातो, असं गंभीर आरोप शिवसेना आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी केलाय. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर जयस्वाल यांनी हा गंभीर आरोप केल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आशिष जयस्वाल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. जयस्वाल यांची नाराजी दूर करण्यसाठी शिवसेनेचे (Shivsena) वरीष्ठ नेते त्यांच्याची चर्चा करत असल्याची माहिती मिळतेय.

शिवसेना आमदार आशिष जैस्वाल यांनी आपल्याच मंत्र्यांवर गंभीर आरोप केल्यानं खळबळ माजली आहे. इतकचं नाही तर त्यांनी सरकारला इशाराही दिलाय. ‘काही मंत्री आमदारांना टक्केवारी मागतात. याबाबत आज मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार आहे. आमदार आहेत म्हणून सरकार आणि मंत्री आहेत. निधीवाटपाबाबत नाराजी कायम आहे. आमदार या सरकारच्या विरोधात जाऊ शकतात, असा इशाराच त्यांनी दिला आहे. ‘मतदारसंघाला न्याय मिळायला हवा. निधीचा असमतोल आम्ही कधीही सहन करणार नाही. मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यावरच निधी दिला जातो. आमच्यासाठी आधी मतदारसंघ, मग पार्टी आणि नंतर महाविकास आघाडी महत्त्वाची आहे. पक्षाच्या तिकीटावर निवडणूक आलेल्या आमदारांनाही आधी मतदारसंघ महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवावे, असंही जैस्वाल म्हणाले.

संजय राऊत म्हणतात जैस्वाल शिवसेनेचेच

आशिष जयस्वाल यांच्या आरोपांबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता निवडणुकीमुळे छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांना आणि अपक्षांच्या भूमिकांना धार येते. पण जैस्वाल हे शिवसेनेचे आहेत आणि ते नाराज नाहीत, असा दावा त्यांनी केलाय. तर कुणी मंत्री जर टक्केवारी मागत असेल तर त्याचा खुलासा जयस्वाल यांनी करावा, विधानसभेत प्रश्न उपस्थित करावा, मुख्यमंत्र्यांना सांगावं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

प्रविण दरेकरांचा ठाकरे सरकारला टोला

आशिष जैस्वाल यांनी शाल जोडे मारत सरकारला घरचा आहेर दिलाय. जे आरोप आम्ही भाजपवाले करत आहोत की, हे टक्केवारीचं सरकार आहे. आता सत्तेतील आमदारच म्हणत आहेत की टक्केवारी मागितली जातेय. सरकार म्हणून स्वत: टक्केवारी घ्यायची आणि त्याच आमदारांच्या जीवावर राज्यसभेचा दुसरा खासदार पाठवू इच्छित आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावलाय.