डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजपची जवळीक वाढली आहे. यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजप आणि मनसेची युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजप मनसे युतीवर प्रतिक्रिया दिली होती. नुकतंच यावर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. (MNS MLA Raju Patil Comment On MNS BJP Alliance)
“आम्ही अजून तरी भाजप-मनसे युतीची बातचीत केलेली नाही. अकेले दम पर भी हम इतिहास करने वाले हे,” असे आशिष शेलार म्हणाले. या प्रतिक्रियेला उत्तर देताना राजू पाटील यांनी टोला लगावला.
“आम्ही त्यांना कुठे विचारलं आहे. आम्हाला घ्या असे आम्ही त्यांना विचारायला गेलो आहे का उगाचच काहीतरी झगामगा माझ्याकडे बघा हे असं चालतं नाही. आम्ही विचारलं तर तुम्ही त्यावर बोला. प्रतिक्रिया द्या. जर आम्ही विचारलचं नाही, तर यावर का प्रतिक्रिया देत आहात,” असा टोलाही राजू पाटील यांनी लगावला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या (Raj Thackeray Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Ayodhya) यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले.
राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट होती का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
दरम्यान, शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर, भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य (BJP’s Slogan BMC election) जाहीर केलं आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई सेवा सेतूचं उद्घाटन केलं आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची घसरण झाली असली तरी आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे. (MNS MLA Raju Patil Comment On MNS BJP Alliance)
संबंधित बातम्या :
राज ठाकरे अयोध्येला जाणार, फडणवीसही जाणार, दोघांची मुंबईसाठी युती होणार?
पुण्यात मनसेची मोर्चेबांधणी, राज ठाकरेंचा दोन दिवस पुणे दौरा