BMC निवडणुकांपूर्वी मुंबईत नामांतराचा वाद पेटला, 3 प्रकल्प; महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे सरकार, वाद काय?

| Updated on: Jan 13, 2023 | 8:37 AM

महाविकास आघाडीचे सरकार जाताच, आता युती सरकारकडून बीडीडी चाळीच्या नामांतर नव्याने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BMC निवडणुकांपूर्वी मुंबईत नामांतराचा वाद पेटला, 3 प्रकल्प; महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे सरकार, वाद काय?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः मुंबई महापालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर राजकारण (Politics) चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत. त्यातच आता मुंबईतल्या तीन प्रकल्पांच्या नामांतराच्या मुद्द्याला हवा मिळाली आहे. मुंबईतल्या बहुचर्चित वरळी, नायगाव आणि ना.म.जोशी मार्ग बीडीडी (BDD) चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पाच्या नामंतरणाचा वाद आता पून्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हाविकास आघाडी सरकार असताना या तीनही पुर्नविकास प्रकल्पांचे नामंकरण झाले होते. मात्र आता त्यास विरोध सुरु झाला आहे.

डाळा विधानसभेचे भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, नायगांव बीडीडी चाळ पुर्नविकास प्रकल्पाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी काॅम्पलेक्स नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकारने वरळी बीडीडी चाळीला स्व. बाळासाहेब ठाकरे नगर, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीला स्व. राजीव गांधी नगर आणि नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर असे देण्याचे ठरवण्यात आले होते. याबाबत महाविकास आघाडी सरकारने शासन निर्णयही जाहिर केला होता.

बीडीडीतील इतर संघटनांनी मात्र त्यावेळी नामकरणाला कडाडून विरोध केला होता. आता दिलेली नावे महान व्यक्तींची आहेत, मात्र तरीही बीडीडीत झालेल्या चळवळींशी, इतिहासाशी त्यांचा थेट संबंध नाही.

त्यामुळे ही नावे बदलून वरळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर नाव द्यावे. तसेच इतर चाळींना छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि महात्मा फुले नगर असे नाव द्यावे अशी मागणी केली होती.

तसेच त्याचवेळी श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, रणरागिणी अहिल्याताई रांगणेकर, एस. एम. जोशी, पी.के. कुरणे, प्रबोधनकार ठाकरे यांची नावेही त्यावेळी नामंकरणासाठी पुढे करण्यात आली होती.

तसेच मुळात पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर नामकरण करणे आवश्यक होते. त्यातही रहिवाशांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन नामांतर करणे गरजेचे होते. मात्र, असे न करता महाविकास आघाडी सरकारने परस्पर निर्णय घेतल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार जाताच, आता युती सरकारकडून बीडीडी चाळीच्या नामांतर नव्याने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.