महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार काही तासांवर? शिंदे-फडणवीसांची दिल्लीत बैठक… संजय गायकवाड यांचा मोठा दावा

| Updated on: Jan 24, 2023 | 12:07 PM

मी काही मंत्रीपदाची मागणी केली नाहीये पण लवकरात लवकर मंत्रिपद विस्ताराचा निर्णय होईल अशी चर्चा आहे, असल्याचं संजय गायकवाड यांनी सांगितलं.

महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार काही तासांवर? शिंदे-फडणवीसांची दिल्लीत बैठक... संजय गायकवाड यांचा मोठा दावा
Image Credit source: social media
Follow us on

गिरीश गायकवाड, मुंबईः राज्याला प्रतीक्षा लागलेल्या शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी येत्या काही तासात धडकण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या आमदारानेच हा दावा केलाय. बुलढाणा (Buldhana) विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी यासंबंधीचं सूतोवाच केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत आज पक्षश्रेष्ठींसोबत बैठक पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लगेच येईल, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय.

आज निर्णय होणार?

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक आमदार इच्छुक आहे. सगळ्यांनाच वाटतंय, मंत्रिपदाचा विस्तार झाला पाहिजे. त्यासाठीच राज्याचे दोन्ही नेते दिल्लीला रवाना झालेले आहेत..

मी काही मंत्रीपदाची मागणी केली नाहीये पण लवकरात लवकर मंत्रिपद विस्ताराचा निर्णय होईल अशी चर्चा आहे.. आजची जर बैठक झाली तर लगेच निर्णय होईल, असा दावा संजय गायकवाड यांनी केलाय.

मला चिखलात टाकलं होतं..

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप करताना संजय गायकवाड म्हणाले, ‘ मला दगड धोंड गृहीत समजून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या चिखलात यांनी टाकलं होतं. त्या चिखलातून झेप घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि आता नैसर्गिक युतीसोबत आम्ही काम करत आहोत…

बाळासाहेब ठाकरेंचं विधान भवनातील तैलचित्र हा दांभिकपणा असल्याची टीका उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु आहे. हिंमत असेल तर तुमच्या वडिलांच्या नावावर निवडणूक लढवा, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नका, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलंय. त्यावर संजय गायकवाड म्हणाले…

साहेब ही कुणाची प्रायव्हेट मालवत्ता नाहीये. राष्ट्रपुरुष सगळ्यांचे असतात. त्यांचा फोटो आणि कार्यक्रम सादर करण्याचे अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहेत. वैयक्तिक कुणी हक्क सांगू शकत नाही. मोदींची आम्ही माणसं आहोत तर शिवसेना भाजप म्हणून आम्ही एकमेकांची माणसं आहोत, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय.

हिंदुत्वाच्या विचारासाठी आम्ही बाहेर पडलो…

1992 ला 18 आमदार फुटले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी आमदार गेले असा शब्द वापरला होता. परंतु ते आमदार बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडून सत्तेच्या लालच्या पोटी तिथे गेले होते… आम्ही आमदार बाळासाहेबांचा विचार घेऊन हिंदुत्वाचा विचार घेऊन बाहेर पडलो.. त्यामुळे त्यांनाच तुडवण्याची गरज आहे, असं प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलंय.