देवेंद्रजीचं ‘ते’ सत्य वाक्य घरबश्याला झोबलं; सामना अग्रलेखातील टीकेला भाजपचं प्रत्युत्तर

Saamana Editorial on Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री अर्धग्लानी अवस्थेत! म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका; तर भाजपचा पलटवार. देवेंद्रजीचं 'ते' सत्य वाक्य घरबश्याला झोबलं, असं ट्विट भाजप आमदाराने केलं आहे.

देवेंद्रजीचं ते सत्य  वाक्य घरबश्याला झोबलं; सामना अग्रलेखातील टीकेला भाजपचं प्रत्युत्तर
| Updated on: Aug 19, 2023 | 9:20 AM

मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे अर्धग्लानी अवस्थेत असल्याचं सामनात म्हणण्यात आलं आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा!, असं म्हणत सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. त्याला आता भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे.भाजपचे आमदार राम कदम यांनी सामना अग्रलेखातील टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

राम कदम यांनी ट्विट करत सामना अग्रलेखातील टीकेला उत्तर दिलं आहे. फेसबुक सरकार आणी फेस टू फेस सरकार, असं देवेंद्र फडणवीस यांचं वाक्या तुम्हाला अन् तुमच्या घरबश्याला झोबलं, असं म्हणत राम कदम यांनी सामना अग्रलेखातील टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.

राम कदम यांचं ट्विट

आदरणीय देवेंद्रजींवर टीका करणं… तुमची उरलं सुरलं अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय आवश्यकता आहे, हे महाराष्ट्र जाणतो. खरं मूळ फेसबुक सरकार आणि फेस टू फेस सरकार … हे देवेंद्रजीच सत्य वाक्य तुम्हाला अन तुमच्या घरबश्याला झोबलं. बंद दाराआड हा देवेंद्रजी चा शब्द तर भर नशेत तुमची जिरवणारा होता. असो वसुली बंद झाली. महापालिका कशी तुम्ही लुटली ते लोकांसमोर पुरव्यानिशी येऊ लागले. त्याचाच हा परिणाम. वैफल्यातुन झालेला हा जळफळाट देशी घेऊन व्यक्त झालेला दिसतो आहे. तुम्हाला खुले आव्हान… हिंमत असेल. तर देवेंद्रजी जे बोलले त्यात काय चुकीचे होते ते सांगा? आहे हिंमत?

सामना अग्रलेखात नेमकं काय?

देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.