“ही कृती कॅबिनेट मंत्र्याला न शोभणारी, राष्ट्रवादीची ही विचारधारा नाहीच, सारा संगतीचा परिणाम”

Rohit Pawar on Anil Patil : अवघ्या चार दिवसांच्या संगतीचा एवढा परिणाम होत असेल तर हे जरा आश्चर्यकारकच!; रोहित पवार यांचा राज्य सरकारमधील मंत्र्यावर घणाघात

ही कृती कॅबिनेट मंत्र्याला न शोभणारी, राष्ट्रवादीची ही विचारधारा नाहीच, सारा संगतीचा परिणाम
Rohit Pawar
| Updated on: Jul 08, 2023 | 8:44 AM

मुंबई : अजित पवार यांनी बंड केलं. त्यांना आमदारांचाही पाठिंबा आहे. अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची तर आणखी आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांचं त्यांच्या मतदारसंघात जंगी स्वागत केलं जातंय.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनिल पाटील पहिल्यांदाच जळगावमधील अमळनेर या आपल्या मतदार संघात दाखल झाले. तिथं त्यांचं जंगी स्वागत केलं गेलं. अनिल पाटील यांच्या या सत्कारादरम्यानचा एक संतापजनक व्हीडिओ समोर आला आहे.

अनिल पाटील यांच्या स्वागतासाठी चक्क अनाथ आश्रमातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना रस्त्याच्या दुतर्फा बसवण्यात आलं होतं. शाळेचा गणवेश घालून या शाळकरी मुलांना भर उन्हात रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसवण्यात आलं होतं.

हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे आणि मंत्र्यांच्या स्वागताला शाळकरी मुलं रस्त्यावर कशासाठी बसवण्यात आलंय? असा संतापजनक सवाल आता विचारण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत अनिल पाटील यांच्यावर टीका केलीय.

स्वागत करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून रस्त्यावर ताटकळत ठेवणं, हे कॅबिनेट मंत्र्याला न शोभणारं आहे… राष्ट्रवादी काँग्रेसची तर ही विचारधारा असूच शकत नाही आणि संगतीचा परिणाम अवघ्या चार दिवसातच होत असेल तर हे जरा आश्चर्यकारकच आहे, असं रोहित पवार म्हणालेत.

रोहित पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज नाशिकच्या येवल्यात सभा होत आहे. त्यावर पावसाची परिस्थिती बघता दौरा पुढे ढकलावा असे शरद पवार यांचे मत होतं. पण कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी हट्ट धरला म्हणून पवार साहेब हो म्हणाले. हाडाचे कार्यकर्ते एका विचाराने शरद पवार यांच्या सोबत राहिले. सूक्ष्म नियोजन केलं आहे. खूप चांगली सभा होईल, अंस रोहित पवार म्हणालेत.

दोन दिवसांपूर्वीच नियोजन पाहिलं तर नाशिकचं नियोजन होतं. एक दिवस व्हावा म्हणून नाशिक जिल्हा होतोय. येवल्याच्या जनतेने साहेबांना मुद्दामहून बोलावलं. प्रतिसादापेक्षा या भागावर शरद पवारसाहेबांचं प्रेम आहे. नाशिकबद्दल अनेक आठवणी ते सांगत असतात. एकवेळ खूप आमदार निवडून आले होते. या नाशिक जिल्ह्याने पवारांना ताकद दिलीय. नाशिकचे लोक मनापासून पवारसाहेबांसोबत आहेत, असंही रोहित पवार म्हणाले.