शरद पवार आणि अजित पवार भेटीवर संजय राऊतांचं भाष्य; म्हणाले आता यावर…

Sanajay Raut on Sharad Pawar Ajit Pawar Meeting in Pune : अजित पवार-एकनाथ शिंदे यांचं काय होणार?, महाराष्ट्राचं गोलमाल राजकारण; संजय राऊतांचं शरद पवार आणि अजित पवार भेटीवर भाष्य. महाराष्ट्राचं गोलमाल राजकारण! म्हणत संजय राऊत यांची राज्यातील राजकीय हालचालींवर भाष्य

शरद पवार आणि अजित पवार भेटीवर संजय राऊतांचं भाष्य; म्हणाले आता यावर...
आयेशा सय्यद | Updated on: Aug 20, 2023 | 8:31 AM

मुंबई | 20 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेट झाली. उद्योगपती अनिल चोरडिया यांच्या घरी ही भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अशा भेटी संभ्रम निर्माण करतात, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. तसंच आम्हीही एकनाथ शिंदे यांना भेटलो तर? असा इशारा वजा सवालही संजय राऊतनी विचारला होता. आता आजच्या सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाच नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार भेटले. हे विषय आता मागे टाकायला हवेत, असं संजय राऊत म्हणालेत.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

श्री. शरद पवार आणि अजित पवार भेटले. हे विषय आता मागे टाकायला हवेत. दोन पवारांतली भेट ही राजकीय नसावी. श्री. पवार यांनी राज्यात अनेक मोठ्या संस्था उभ्या केल्या. शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्रात त्या काम करतात. त्या संस्थांवर शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांना बसवले. आता पुढे काय, हा प्रश्न आहे. पवारांच्या हयातीत अजित पवारांनी त्यांच्या पक्षावरच दावा सांगितला, तेथे संस्थांचे काय?

श्री. शरद पवार यांच्या राजकारणावर महाराष्ट्र गेली 45 वर्षे चर्चा करतो आहे. पवार यांच्या संसदीय राजकारणास पन्नास वर्षांचा कालखंड होऊन गेला. इतका प्रदीर्घ काळ चर्चेत व राजकारणात असलेला दुसरा नेता आज तरी देशाच्या राजकारणात नाही. आता श्री. पवार पुनः पुन्हा चर्चेत येत आहेत ते अजित पवार यांच्याशी सुरू असलेल्या बैठकांमुळे. अजित पवार यांनी पवारांशी राजकीय नाते तोडले. अजित पवार व त्यांचा गट भाजपच्या गोटात शिरला व त्यामुळे त्यांच्या गटातील आमदारांवर सुरू असलेल्या ‘ईडी’ कारवायांना ब्रेक लागला.

शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटण्याचे हे मुख्य कारण आहे. अजित पवार हे आज राजकारणातले बलवान नेते आहेत; पण सत्तेची गदा व शरद पवार यांचे नाव त्यांच्या पाठीशी नसेल तर अजित पवार कोण, हा प्रश्न सगळ्यांनाच पडेल. अजित पवार यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. आजच्या शिखरावर नेऊन बसवले. त्या शिखरावरून त्यांनी शरद पवार यांनाच ढकलण्याचा प्रयत्न केला. तरीही शरद पवार अजित पवार यांच्यात ‘संवाद’ होतो. त्यामुळे लोकांत संभ्रम निर्माण होणारच.

शरद पवार व अजित पवार का भेटत आहेत? माझ्या माहितीनुसार या बैठका राजकीय नाहीत; तर श्री. शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानपासून कृषी, शेती, सहकारासंदर्भात ज्या संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले त्या सर्व संस्थांवर अजित पवार यांना पवारांनी आणले. हजारो शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांचे भविष्य या संस्थांत आहे. संस्थांचे भवितव्य काय हे ठरवण्यासाठी या बैठका असाव्यात. महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठया रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी श्री. शरद पवार, तर संचालक म्हणून अजित पवार आहेत. असे त्रांगडे अनेक संस्थांत आहे. या संस्थांचा वेलू गगनावर नेण्याचे काम श्री. शरद पवार यांनी केले. त्या वेलूवर आज जे लटकत उभे आहेत. त्यांनी त्यांची पदे सोडून स्वतःच्या नव्या संस्था निर्माण करण्याचे राजकीय औदार्य दाखवायला हवे. पण शेवटी हा पवारांच्या कुटुंबातला अंतर्गत प्रश्न आहे. जेथे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवरच अजित पवार दावा सांगत आहेत व श्री. पवारांच्या हयातीत त्यांच्या पक्षावर स्वामित्व सांगितले गेले, तेथे संस्थांच्या हक्कांवर काय बोलायचे?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us