नगर पंचायत निवडणूक निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा

| Updated on: Jan 19, 2022 | 4:58 PM

जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो! महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्‍या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो!' असं ट्वीट करत फडणवीस यांनी भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा केला आहे.

नगर पंचायत निवडणूक निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागला. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहिल असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. या निवडणूक निकालानंतर फडणवीस यांनी ट्विटरवरुन मतदारांचे आभारही मानले आहेत.

‘मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो! महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्‍या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो!’ असं ट्वीट करत फडणवीस यांनी भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा केला आहे.

तसंच ‘कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.मा. मोदीजींचे नेतृत्त्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेच हे यश आहे’, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला इशारा

‘आजच्या निवडणुकांचे निकाल पाहून पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की, भारतीय जनता पार्टी हा राज्यातील सर्वोच्च पक्ष आहे. मी आताही म्हणतो की महाराष्ट्रात एकट्याने लढून दाखवा, मग कोणाची ताकद जास्त आहे ते तुम्हाला कळेल. विचार-आचाराने एक नसतानाही युती करुन भाजपला आव्हान देत असाल तर पुढच्या निवडणुकांमध्ये आम्ही तुम्हाला पुरुन उरु’, असा इशाराच चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय. त्याचबरोबर ‘मी भारतीय जनता पार्टीच्या गावागावांमधील नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे विजयी उमेदवारांचे आणि भाजपला मतदान करणाऱ्या मतदार बांधवांचे मनापासून अभिनंदन करतो’, अशा शब्दात पाटील यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केलं आहे.

नगर पंचायत निवडणूक निकाल (106 जागांपैकी आतापर्यंत 96 जागांचे निकाल हाती)

राष्ट्रवादी काँग्रेस – 26
भाजप – 25
काँग्रेस 21
शिवसेना – 17
अन्य – 8

इतर बातम्या : 

राष्ट्रवादी काँग्रेसच राज्यातील नंबर एकचा पक्ष, जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांचे अभिनंदन, तर मलिकांचा भाजपवर निशाणा

Goa Eelections 2022 : लढाई आधीच शस्त्र टाकले? राऊत म्हणतात, गोव्यात भलेही आम्ही सरकार बनवणार नाही पण..