‘वंदे मातरम’ ऐवजी काय म्हणावे?; नाना पटोलेंनी दिले दोन पर्याय

| Updated on: Oct 02, 2022 | 3:53 PM

सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या पदयात्रेची दखल घ्यावी लागली. म्हणूनच ते दिल्लीच्या मशिदीत जाऊन इमामांची भेट घेऊन आले.

वंदे मातरम ऐवजी काय म्हणावे?; नाना पटोलेंनी दिले दोन पर्याय
'वंदे मातरम' ऐवजी काय म्हणावे?; नाना पटोलेंनी दिले दोन पर्याय
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्य सरकारने नवी जीआर काढला आहे. त्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना हॅलो ऐवजी वंदे मातरम (vande mataram) म्हणावं लागणार आहे. यापूर्वीही वंदे मातरमच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला विरोधकांनी घेरलं होतं. आता पुन्हा एकदा शिंदे सरकारने (shinde government) नवा जीआर काढल्याने सरकार विरोधकांच्या रडारवर आलं आहे. वंदे मातरमला आमचा विरोध नाही. पण आपला देश कृषीप्रधान आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. या अन्नादात्याबदद्ल कृतज्ञता व्यक्त करावी याच भावनेने ‘जय बळीराजा’ व ‘रामराम’ म्हणावे अशी आमची भूमिका आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी म्हटलं आहे.

टिळक भवन येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली पाहण्यात आली. यावेळी भजन गायनही झाले. यावेळी नाना पटोले बोलत होते. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाचे नेते बिथरले आहेत. भाजपाच्या नेत्यांचे संतुलन बिघडले असून त्याच निराश मानसिकतेतून पदयात्रेवर टीका केली जात आहे, असं नाना पटोले म्हणाले.

भाजपाच्या या टीकेचा पदयात्रेवर तसूभरही परिणाम होणार नाही. ही पदयात्रा जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादासह काश्मीरपर्यंत मार्गक्रमण करत राहील, असं त्यांनी सांगितलं. भाजपाच्या अहंकारी सत्तेला देशातील जनता कंटाळली आहे. हुकूमशाही कारभार व अहंकार यामुळे जनतेमध्ये भाजपाविषयी मोठा संताप आहे, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

भारत जोडो पदयात्रेवर पहिल्या दिवसापासूनच भाजपाचे नेते टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही टीका त्यांच्यावर उलटत आहे. पदयात्रेतील लोकांचा सहभाग व प्रतिसाद प्रचंड आहे. लोकशाही, संविधान अबाधित ठेवणे व भारताची एकात्मता व विविधता कायम राखण्यासाठी निघालेल्या या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे, असा दावा त्यांनी केला.

सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या पदयात्रेची दखल घ्यावी लागली. म्हणूनच ते दिल्लीच्या मशिदीत जाऊन इमामांची भेट घेऊन आले. भाजपातील काही दुय्यम दर्जाचे पदाधिकारी भारत जोडो यात्रेवर अनावश्यक टीका करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा टीकेमुळे भाजपाच्या नेत्यांचेच हसे होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

कोण, कोणता मेळावा घेतो, किती खर्च करतो, हे काँग्रेससाठी महत्वाचे नाही. भाजपा जर महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांवर मेळावा घेणार असेल तर त्यांच्या मेळाव्याला आम्ही लोकं पाठवू, असा टोलाही त्यांनी लगावला.