गणेशोत्सवात चाकरमान्यांना ‘कोकणबंदी’ केली तर आंदोलन, राणे आक्रमक

| Updated on: Jul 10, 2020 | 2:25 PM

कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, त्यांना कोणत्याही पासची सक्ती करु नये, असं नारायण राणे म्हणाले.

गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणबंदी केली तर आंदोलन, राणे आक्रमक
Follow us on

मुंबई : गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. ‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ असा टोलाही यावेळी राणेंनी मुंबईत पत्रकार परिषदेत लगावला. भाजप नेते आशिष शेलार यांच्यानंतर नारायण राणे यांनीही चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याची मागणी केली. (Narayan Rane warns to Protest if Konkani People not allowed to visit Konkan during Ganeshotsava)

“कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेले चालणार नाही. त्याचे आई, वडील, पत्नी गावी असतात. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, त्यांना कोणत्याही पासची सक्ती करु नये. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल.” असं नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा : लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट नको, कोकणवासियांची बाप्पाशी भेट कशी होणार? : आशिष शेलार

“शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनेचे मंत्री आणि नेते यांचेच ऐकले जात नाही. महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. शिवसैनिकानाच कोणी विचारत नाहीत, अशी स्थिती आहे.” असंही राणे म्हणाले.

“शिवसेनेकडे मुलाखत घ्यायला माणसं नाहीत, असं दिसत आहे. पण किमान ज्यांची मुलाखत घेतली, ते अनुभवी तरी आहेत. आधी ज्यांची घ्यायचे ते सगळं वाचून बसायचे. ‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ अशी त्यांची स्थिती आहे.” असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला. काही दिवसांपूर्वीच “जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे,” अशी खरपूस टीका राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली होती.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“मुंबईत पाच-पाच हजार जणांचे कोरोनामुळे प्राण जातात, राज्यात आठ हजार जण दगावले, हे राज्य सरकारचे अपयश आहे” असा घणाघात राणेंनी केला.

आशिष शेलार काय म्हणाले?

“लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट करु नका. कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती.” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे. “सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य आहे का?” असे सवाल शेलार यांनी विचारले आहेत. (Narayan Rane warns to Protest if Konkani People not allowed to visit Konkan during Ganeshotsava)