राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका नाही : सुधीर मुनगंटीवार

| Updated on: May 26, 2020 | 1:05 PM

राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. तशी मागणी भाजपने केलेली नाही. ती राणेंची वैयक्तिक मागणी आहे", असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका नाही : सुधीर मुनगंटीवार
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या खासदार नारायण राणे यांना त्यांच्याच पक्षाने झटका दिला आहे. कारण नारायण राणेंने केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका किंवा मागणी नाही, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. “राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. तशी मागणी भाजपने केलेली नाही. ती राणेंची वैयक्तिक मागणी आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir Mungantiwar reaction on Narayan Ranes president rule demand)

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर आहे, पण राज्यात राष्ट्रपती राजवटीची गरज नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

नारायण राणे यांनी कालच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. मात्र नारायण राणेंची ही भूमिका म्हणजे भाजपची नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

राष्ट्रपती राजवटी लागू करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिले आहेत, संविधानात तरतुदी आहेत. काँग्रेसने तरतुदीचं उल्लंघन केलं, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिले आहेत. त्यानुसारच राष्ट्रपती राजवट लागू होते.

राणेंची कर्मभूमी मुंबई आहे. मुंबईची स्थिती पाहून वेदना होतात. या सरकारने उपाययोजना करायला हव्यात. मुंबईत कोरोना पसरत असताना, काही उपाययोजना होत नाहीत, त्यामुळे दु:ख आहे.

मुंबई महापालिकेच्या ६० हजार कोटींच्या ठेवी आहेत. वर्षाला ३ हजार कोटी व्याज येतं. या ठेवी कोणाच्या वैयक्तिक नाहीत, त्या जनतेसाठी खर्च कराव्या. मायबाप सरकारने पुढे येऊन उपाययोजना कराव्यात.

नारायण राणेंनी मांडलेलं मत व्यक्तीगत आहे. पक्षाचं मत फडणवीस आणि चंद्रकांतदादा मांडतील. राणे साहेब आक्रमक आहेत, त्यांना दु:ख, वेदना आहेत. मुंबईची स्थिती पाहून ही मागणी केली आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

नारायण राणे काय म्हणाले होते?

“ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी”, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. कोरोनामुळे राज्यावर गहिरं संकट आहे, असं नारायण राणे म्हणाले.

संजय राऊतांचा पलटवार

राज्यात काही कामं होत नाहीत असा आरोप करुन राष्ट्रपती राजवटीची मागणी कोणी करत असेल तर आधी गुजरातमध्ये लावावी लागेल. गुजरातमध्ये इस्पितळांची स्मशाने झालेत, अंधार कोठड्या आहेत, तिथल्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज द्यायला हवी होती. गुजरात हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचं म्हणजे भाजपचं सरकार लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये येऊ शकतं, तिकडे संकट गंभीर आहे, तिथे जाऊन ते राज्य निर्माण करु शकतात, अशीही टोलेबाजी त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

दरम्यान, राज्यातील या सर्व राजकीय घडामोडींवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाष्य करण्याची शक्यता आहे. फडणवीस हे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

(Sudhir Mungantiwar reaction on Narayan Ranes president rule demand)

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रातील भाजपवाले लंडनमध्ये सरकार स्थापन करु शकतील, महाराष्ट्रात नाही : संजय राऊत

ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी