PM Narendra Modi | देशाचे पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच!! 2024 ची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य!

| Updated on: Aug 01, 2022 | 2:28 PM

बिहारमधील दोन दिवसीय बैठकांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीदेखील मोठं वक्तव्य केलं. इतर कोणत्याही पक्षांनी कितीही प्रयत्न केले तरी आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 40 वर्षांएवढा काळ लागेल, असे ते म्हणाले.

PM Narendra Modi | देशाचे पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच!! 2024 ची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य!
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Image Credit source: social media
Follow us on

पाटणा (बिहार): भारतातील आगामी 2024 मधील लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याच नेतृत्वात लढेल, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह (Arun Singh) यांनी केलंय. बिहारमध्ये भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक झाली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा ( J P Nadda), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी नेते उपस्थित होते. बिहारमध्येदेखील जनता दल युनायटेडसोबत निवडणूक लढवली जाईल. भाजप नेहमी युतीचा धर्म पाळते. आपण सोबतच निवडणूक लढू, 2024 असो वा 2025.. असं वक्तव्य अरुण सिंह यांनी केलं. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरुण सिंहांचं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण असून देशभरात सध्या या वक्तव्याची चर्चा आहे. याच बैठकीत जे पी नड्डांनीदेखील अत्यंत गंभीर आणि खळबळजनक वक्तव्य केलं. महाराष्ट्रातूनही आता शिवसेना संपतेय, एक दिवस देशात फक्त भाजपच असेल, असं जे पी नड्डा म्हणाले.बिहारमधील भाजपाच्या 16 जिल्हा पक्ष कार्यालयाचं उद्घाटन जे पी नड्डा यांच्या हस्ते झालं. यावेळी समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रादेशिक पक्षांवर हल्ला चढवला.

नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब?

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल याची उत्सुकता अवघ्या देशाला लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह म्हणाले, जनता दल युनायटेडसोबत आमची नाराजी नाही. बिहारमध्ये जदयूसोबतच पुढील निवडणुका आम्ही लढू. तसेच नरेंद्र मोदी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असतील. त्यांच्याच नेतृत्वात 2024 मधील निवडणुका लढल्या जातील… अरुण सिंहांच्या या वक्तव्याला भाजपचे फायर ब्रँड नेते गिरीराज सिंह यांनीदेखील दुजोरा दिला.

‘देशात फक्त भाजप शिल्लक राहिल’

बिहारमधील दोन दिवसीय बैठकांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीदेखील मोठं वक्तव्य केलं. इतर कोणत्याही पक्षांनी कितीही प्रयत्न केले तरी आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 40 वर्षांएवढा काळ लागेल. देशात भाजपाविरोधात लढणारा एकही पक्ष शिल्लक नाही. महाराष्ट्रात देखील शिवसेना संपतेय. याचप्रमाणे इतर राजकीय पक्षही आता संपुष्टात येत आहेत, असं वक्तव्य जे पी नड्डांनी केलं.

‘घराणेशाहीविरोधात भाजप’

या बैठकीत बोलताना जे पी नड्डा म्हणाले, आम्ही प्रादेशिक मुद्द्यांवर भर दिला. घराणेशाहीविरोधात आमचा लढा आहे. काश्मीरमध्ये पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल यासह हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आम्ही याच मुद्द्यावरून लढत आहोत. वंशवादाविरुद्धचा लढा हे भाजपसमोरील मोठे आव्हान आहे…